

डिचोली: जवळपास चार वर्षांच्या खंडानंतर पिळगाव येथील ''कास'' ही वायंगण शेती आता पुन्हा लागवडीखाली आली आहे. चार वर्षांनंतर पिळगावमधील शेतकरी पुढे सरसावलेले असून, शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने या शेतीत उतरून तरव्याची लावणीदेखील केली आहे.
''कोविड'' महामारीनंतर शेतकऱ्यांनी ''कास'' शेतीकडे पाठ केली होती. त्यामुळे मागील जवळपास चार वर्षांपासून ही शेती पडीक पडलेली होती. आता यापुढेही ही शेती फुलविण्याचा संकल्प या शेतकऱ्यांनी केला आहे.
''कास''शेती लागवडीखाली आली असली, तरी पिळगावच्या श्री महादेव मंदिर परिसरातील वायंगण शेती यंदाही पडीक पडली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी ही शेती करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. डिचोली तालुक्यातील अन्य भागांच्या तुलनेत पिळगावमध्ये सर्वात प्रथम वायंगण शेतीची लागवड करण्यात येते.
चार वर्षांपूर्वीपासून पिळगावमधील शेतकरी ''कास''ही शेती कसत होते. मात्र ''कोविड'' महामारीनंतर शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाठ केली होती. परिणामी जवळपास चार वर्षांपासून ही शेती पडीक पडली आहे.
शेती पडीक पडल्याने शेतीत खारफुटीसह गवत वाढले होते. शेतकऱ्यांनी वाढलेले गवत कापून शेती स्वच्छ करुन ती लागवडीखाली आणली आहे. कृषी खात्याच्या सहकार्याने आमच्या पूर्वजांनी राखून ठेवलेली शेती यापुढेही लागवडीखाली आणणार, असे यतीन फाळकर, महादेव सुर्लीकर या शेतकऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.