

पणजी: पणजी बसस्थानकावर असलेली शुद्ध जल सुविधा मागील काही महिन्यांपासून बंद पडली होती. मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि नळ तुटून पडले होते. या प्रकारामुळे पणजी बसस्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती.
यासंबंधीचे वृत्त ‘दैनिक गोमन्तक’मध्ये ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध होताच कदंब महामंडळ प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी यासंबंधी कारवाई करत शुद्ध जल सुविधा सुरळीत केली तसेच सुविधा बिघाडल्यास, बंद पडल्यास कोठे संपर्क करावा याबाबतची माहिती देण्यात आली असून जर कोणी अस्वच्छता केल्यास, या ठिकाणी भांडी धुण्याचा प्रयत्न केल्यास कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची नोटीसही या ठिकाणी लावण्यात आली आहे.
‘एचएसबीसी इंडिया’ आणि ‘द सोशल लॅब’च्या ‘सीएसआर’ निधीतून या वॉटर कूलरचे जून २०२५ मध्ये केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते लोकार्पण केले होते.
या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, ‘एचएसबीसी इंडिया’चे दीपक शर्मा, ‘टीएसएल’चे आदेश गुप्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. एकदंरीत मागील काही महिने ही सुविधा अनुपलब्ध होती. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली ही सुविधा वर्षभरातच निकामी झाली होती. आता ही सुविधा सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नोटीसही केली जारी
राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. या काळात प्रवाशांना निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो. त्याला आळा घालण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची होती. यापूर्वी याच्या देखभालीची किंवा जर कोणी नुकसान केल्यास दंडात्मक कारवाई कोणी करावी याची सुस्पष्ट कल्पना नव्हती; परंतु आता कदंब प्रशासनाने ती जबाबदारी स्वीकारत नोटीसही जारी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.