Goa News : भोम येथे चौपदरी मार्गाला विरोध; आराखड्यात बदल करा

गावाबाहेरून रस्ता नेण्याची मागणी
Highways
HighwaysDainik Gomantak

भोम येथे भर गावातून चौपदरी रस्ता नेल्यास गावच नामशेष होणार असून स्वयंभू मंदिराचे अस्तित्वही नष्ट होणार असल्याने हा चौपदरी रस्ता गाव सोडून इतर मार्गाने न्यावा, अशी जोरदार मागणी भोम येथे आज (रविवारी) आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यावेळी इतिहासाचे अभ्यासक प्रजल साखरदांडे तसेच स्वप्नेश शेल्डेकर, प्रवीण शेटगावकर इतर पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संजय नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

फर्मागुढी ते बाणस्तारीपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात येत असून या कामावेळी भोम गावातून चौपदरी नपेक्षा सहापदरी रस्ता नेण्याचे घाटत आहे.

भर गावातून हा चौपदरी रस्ता नेण्याच्या प्रकारामुळे गावातील तीन मंदिरांच्या अस्तित्वावर गदा येणार असून ही तिन्ही मंदिरे मोडल्यास गावची संस्कृती आणि अस्मिताच नष्ट होणार आहे.

Highways
Pandurang Madkaikar : ...तर भाजपला सोडचिठ्ठी देण्याची माझी तयारी : पांडुरंग मडकईकर

या तिन्ही मंदिरांनी गावातील एकोपा जपला आहे, गावची अस्मिता राखली आहे आणि कला संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे. अशा स्थितीत चौपदरी रस्ता भर गावातून नेल्यास ही तिन्ही मंदिरे हटवावी लागणार असल्याने लोकांच्या भावनेचाही प्रश्‍न निर्माण होणार असल्याने या चौपदरी आराखड्यात त्वरित बदल करून भर गावातून हा चौपदरी रस्ता नेऊ नये, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गाव सोडून गावाच्या वरच्या बाजूने तसेच खालच्या शेतीच्या बाजूने चौपदरी रस्ता काढणे शक्य आहे, पण ते सोडून भर गावातून रस्ता नेण्यासाठी अट्टहास का?

असा सवालही ग्रामस्थांनी यावेळी करून मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संबंधित सरकारी खात्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे नमूद केले.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गावातील रस्ता रद्द केला होता, तो पुन्हा आता करण्यासाठी सरकार का आग्रही आहे, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.

Highways
GMC Goa : ...तर खासगी रुग्णालयांची गय नाही : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

‘माहिती देण्यास सरकारची टाळाटाळ’

संजय नाईक यांनीही गावातून रस्ता नेण्यामागे कुणाचे प्रयोजन आहे ते स्पष्ट करावे अशी मागणी केली. या रस्त्यासाठी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितली तरी सरकारी यंत्रणा ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे संजय नाईक म्हणाले.

सर्वसामान्य नागरिक सध्या हैराण झाले असून सरकार निर्णय लादत असल्याने नागरिकच हवालदिल झाले असल्याचे संजय नाईक म्हणाले. गावातील फाटाफुटीला राजकारणच कारणीभूत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

इतिहासकालीन मंदिरे वाचवावी ः साखरदांडे

प्रजल साखरदांडे म्हणाले की, गावाची संस्कृती बांधून ठेवलेल्या आणि गावचे श्रद्धास्थान असलेली तिन्ही मंदिरे ही गावची शान असून केवळ रस्त्यासाठी या मंदिरांवर आफत आणता कामा नये. ही मंदिरे इतिहासकालीन असून ही मंदिरे वाचवण्याची आवश्‍यकता आहे.

भोमची ही संस्कृती राखण्यासाठी पुरातत्त्व खात्याला पत्र देऊन तसेच नगरनियोजन खात्याकडून संबंधित मंदिरांसंबंधीचा टॅग लावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही प्रजल साखरदांडे यांनी व्यक्त केली. त्यानुसार पत्रव्यवहारही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com