
वास्को : दाबोळी ते क्विनीनगरपर्यंतच्या उड्डाण पुलाच्या खांबांसाठी वालिस गॅरेजसमोर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडल्याने दाबोळीतील मारुती जाधव यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कंत्राटदाराचा हलगर्जीपणा पुन्हा चर्चेत आला आहे.
कंत्राटदाराच्या बेफिकिरीमुळे यापूर्वी एका वीज कामगाराचा बळी गेला होता. एक कार खड्ड्यात पडून कारचालक जखमी झाला होता; परंतु त्यापासून कोणताही धडा न घेणाऱ्या कंत्राटदाराला कोणाचा आशीर्वाद आहे, हा कंत्राटदार कोणालाही जुमानत नाही, अशी चर्चा येथे रंगली आहे. भविष्यात आणखी कोणी बळी जाण्यापूर्वीच तेथे योग्य ती उपाययोजना करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मारुती जाधव (वय ४० वर्षे) हे बुधवारी (ता. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीने जात असताना एका मोठ्या खड्ड्यात पडले. गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा मृत्यू झाला. या खड्ड्याभोवती अडथळे उभारलेले नव्हते, असे दिसून आले. या उड्डाण पुलाचे सुरू झाल्यावर तेथील पथदीप काढल्याने अंधार असतो.
त्यासाठी कंत्राटदाराने पर्यायी प्रकाश व्यवस्था करणे अपेक्षित होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. तसेच रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहने हाकताना विशेषतः दुचाकीचालकांना बराच त्रास सहन करावा लागतो.
कंत्राटदाराने खड्ड्याजवळ बॅरिकेड्स उभारून प्रकाश व्यवस्था करण्याची गरज आहे. याप्रकरणी ‘गोवा कॅन’चे संचालक रोलंड मार्टिन्स यांनी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी इग्ना क्लिट्स यांना लेखी कळविल्याचे ‘गोवा कॅन’ने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.