

मडगाव : मडगावच्या ईएसआय इस्पितळात उपचारासाठी दाखल केलेल्या एका रुग्णाला पुढील उपचारासाठी जिल्हा इस्पितळात नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने मृत्यू येण्याची दुर्दैवी घटना घडली असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश भगत यांनी केला आहे. या एकंदर घटनेबाबत ईएसआय इस्पितळात संपर्क साधला असता, अधिक माहिती देणे टाळले. उपलब्ध माहितीनुसार, या ईएसआय इस्पितळातील रुग्णवाहिका नादुरुस्त आहे.
अब्दुल मुनाफ यांना या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने, जिल्हा इस्पितळात नेणे आवश्यक असल्याने कुटुंबियांनी अम्ब्युलन्सची मागणी केली .मात्र ती नसल्याने १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला. मात्र तासभर उशिरा ती रुग्णवाहिका इस्पितळात पोहोचली. तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता, असे भगत म्हणाले सरकारच्या तत्काळ प्रतिसादाचा दावा खोटा असल्याची टीका केली आहे.
नावेलीतील आपल्या मित्राचे वडील अब्दुल मुनाफ यांना उपचारासाठी ईएसआय इस्पितळात दाखल करण्यात आलेले होते. त्यांना रात्री पावणेनउ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकार्यांनी ९.३८ वाजता रुग्णवाहिकेला कॉल केला होता. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने १०८ रुग्णवाहिकेला कॉल केल्यानंतर सांगण्यात आले.
१०८ रुग्णवाहिकेच्या ऑपरेटरकडून साडेदहा वाजता रुग्णवाहिका चालकाला संदेश देण्यात आला व पावणेअकरा वाजता रुग्णावाहिका दाखल झाली. मात्र त्याआधी १०.२० वाजता सदर रुग्णाचा मृत्यू झाला होता. केवळ रुग्णवाहिका विलंबाने आल्याने हा प्रकार घडल्याचा दावा भगत यांनी केलेला आहे. वैद्यकीय आणीबाणीसाठी रुग्णवाहिका केवळ ९ मिनिटांत पोहोचत असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, उपरोक्त घटनेमुळे या दाव्याच्या रिस्पॉन्स टाइमच्या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत, असेही भगत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.