Murder Case: हा तर नियोजित हल्ला? कुटुंबियांना ‘पोस्टमॉर्टम रिपोर्ट’ का दिला नाही?

अशा प्रकरणांमुळे समाज आपल्या मुलींवर कडक निर्बंध लादू शकते. मुलींना बाहेर जायला मनाई केली जाऊ शकते.
Murder Case
Murder CaseDainik Gomantak

पणजी: ‘बायलांचो साद’ने सोमवारी मृत तरूणीच्या कुटुंबियांच्या आग्रहावरून हळदोणे येथे कॅंडल मार्च (candle march) आयोजित केला, परंतु त्या निषेध कार्यक्रमाला तीच्या तक्रारदार वडिलांना पोलिसांनी (Goa police) उपस्थित राहू दिले नाही, याबद्दल सादच्या प्रमुख सबिना मार्टिन्स यांनी संशय व्यक्त करीत पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्या म्हणून दाबून टाकण्याचे पूर्वीच ठरवून टाकले आहे. त्यामुळे ते वेगळवेगळ्या दृष्टिकोनातून तपास करण्याचे टाळतात का? असा सवाल उपस्थित केला.

तेव्हा ती विवस्त्र कशी काय?

‘बायलांचो साद’ने या प्रकरणात पणजीत निषेध सभा घेऊन पोलिसांच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्याचे ठरविले आहे. मृत तरूणी सापडली तेव्हा ती विवस्त्र कशा काय? तीचे कपडे कुठे गेले? तीने घट्ट जीन घातली होती ती समुद्रात आपोआप वाहून जाऊ शकत नाही. शिवाय कोणतीही मुलगी संपूर्ण कपडे काढून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने समुद्रात का उतरेल? पोलिसांनी म्हापसा, पणजी बसस्थानक, पर्वरी येथील मॉल समोरचा रस्ता, कळंगुट किनारा येथील सीसीटीव्ही कॅमरे का तपासले नाहीत, असे प्रश्न सबिना मार्टिन्स यांना पडले आहेत. सबिना मार्टिन्स यांना या तरूणीच्या आणि बाणावलीतील बलात्कार प्रकरण यांच्यात साम्यस्थळे आढळतात.

Murder Case
Mandar murder case: जन्मठेपेतील आरोपींची सुटकेसाठी याचिका

हा तर नियोजित हल्ला

त्या म्हणाल्या, बाणावलीतल्या प्रमाणेच गुन्हेगारीला चटावलेले तरुण एकट्या दुकट्या मुलींवर बळजबरी करून त्यांना लुबाडण्याच्या हेतूने आपल्या किनारपट्टीवर सावज हेरत फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाणावलीसारखाच प्रकार कळंगुट येथेही घडला असू शकतो. एकटी मुलगी पाहून किंवा ती आणखी कुणाबरोबर गेली तर या गुन्हेगारांनी तिला धमकावून तिथे विवस्त्र केले असेल व नंतर समुद्रात टाकून दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा तरूणीवर नियोजित हल्ला असू शकतो. काही प्रकरणामुळे तिला धमक्या येत असाव्यात व म्हणून तिने आपल्या वडिलांना ‘माझा तुम्ही मृतदेह पाहाल’ असे त्या दृष्टीनेच सांगितलेले नसेल कशावरून?

ती जीव देण्याच्याच निश्चयाने गेली होती?

कोरोना काळात घरी राहावे लागल्यानंतर तिच्या मनावर परिणाम झाला असण्याची शक्यता ‘बायलांचो साद’च्या प्रमुखांनी फेटाळून लावली आहे. ज्या मॉलमध्ये ती काम करीत होती ते दुकान कोविडमध्ये बंद राहिले. त्यानंतर ते दुकान दुसऱ्याने चालवण्यास घेतल्यानंतर ती कामाला जायला लागली तो तिचा चौथा दिवस होता. ती जेवण न घेता तिथे गेली होती कारण तिची दुसरी नातेवाईक त्या दिवशी जेवण घेऊन येणार होती. ती जीव देण्याच्याच निश्चयाने गेली असती तर तिने आपल्या या नातेवाईकाला आपण येणार नसल्याचे व आपल्यासाठी जेवण आणू नका असे सांगितले नसते का? ती मॉलमध्ये कामाला आली नाही तेव्हाच या नातेवाईकाने तिच्या घरी फोन केला त्यावेळीच घरी कळले की ती कामाला गेली नाही.

Murder Case
Murder Case: तरूणीच्या कुटुंबियांसह हळदोण्यात हजारो लोक रस्त्यावर

लोक भीतीपोटी बोलत नाहीत

सबिना मार्टिन्स पुढे म्हणाल्या, तरूणीला धमकी येत असल्याची शक्यता आहे किंवा त्या दिवशीच तिला काही वजनदार लोक भेटले ज्यामुळे तिचा मृत्यू ओढवला. त्या म्हणाल्या, तरूणीच्या घरचे लोक घाबरलेले आहेत. मी तिच्या घरी गेले त्यावेळी घरच्या मंडळींनी सांगितले की, त्यांना काही फोन आले होते, ती कुणाशी तरी बोलत असताना लोकांनी पाहिले होते व या नातेवाईकांनी त्या बाईला फोन करून यासंदर्भात विचारपूस केली होती. त्यावेळी आता लोक माहिती द्यायला कचरत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यामुळे लोक भीतीपोटी बोलत नाहीत.

माझ्या एका कार्यकर्तीला गुंडांनी सतावले

अशा प्रकरणांमुळे समाज आपल्या मुलींवर कडक निर्बंध लादू शकतो. मुलींना बाहेर जायला मनाई केली जाऊ शकते. पोलिसांनी तर अत्यंत संवेदनशील पद्धतीने अशी प्रकरणे हाताळली पाहिजेत. दुर्दैवाने पोलिस अत्यंत बेजबाबदारीने वागतात, असे सांगून त्या म्हणाल्या की, पर्वरी येथील माझ्या एका कार्यकर्तीला गुंडांनी सतावले, धक्काबुक्की केली. त्यावेळी तिने पोलिस तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी ती नोंदवून घेतली नाही. त्यानंतर तिच्यावर प्रत्यक्ष हल्ला झाला व तिच्या मौल्यवान वस्तूही चोरीला गेल्या तरीही पोलिस या कार्यकर्तीकडे गुन्हेगार म्हणून पाहत आहेत आणि त्यांची वर्तणूकही अयोग्य आहे. पोलिसांनी संवेदनशील बनले पाहिजे. गुन्ह्यांच्या तपासातील त्यांचे कौशल्य वाढविले पाहिजे.

गूढ कधी उकलणार?

तीचे पालक व कुटुंबीय वारंवार दिलेले स्टेट्समेंट बदलत असल्याने तपासाची दिशा भरकटत चालल्याचे पोलिस यंत्रणांचे म्हणणे असून येत्या एक दोन दिवसांत या मृत्यूचे गूढ जगासमोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काही प्रश्न अनुत्तरीतच..

  • तरूणीच्या मृत्यूपूर्वी तिचे कपडे कुणी काढले?

  • तिचे कपडे अजून का सापडलेले नाहीत?

  • कळंगुट किनारा निर्जन नाही, तिथे लोकांची सतत वर्दळ असते. तेथील सीसीटीव्ही कॅमेरा का तपासला जात नाही?

  • कुटुंबियांना ‘पोस्टमॉर्टम रिपोर्ट’ अजून का दिला गेलेला नाही. त्यासाठी त्यांना आरटीआय का दाखल करावा लागला?

  • वडील तक्रारदार असता जबानीच्या नावाखाली त्यांना निषेध मोर्चात सहभागी होण्यापासून आडकाठी आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी का केला?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com