

उत्तर गोव्यातील मोरजी किनारा परिसरात पुन्हा एकदा कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. शांत आणि निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी अलीकडेच काही जणांनी जेवणावळीचे आयोजन केल्याचे दिसून आले.
मात्र कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ग्लास, ताटे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा तसाच टाकून दिल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोनच आठवड्यांपूर्वी या परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.
आज पुन्हा किनाऱ्यावर साचलेला कचरा पाहून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “आपला परिसर स्वच्छ ठेवायची जबाबदारी नेमकी कोणाची – नागरिकांची की पर्यटकांची?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पर्यावरणप्रेमींच्या मते, अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या अस्वच्छतेमुळे किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येत आहे तसेच सागरी जीवसृष्टीवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, किनाऱ्यावर कार्यक्रम आयोजित करताना स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.