
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मडगावकर मतदान करणार नाहीत. कारण मतदानाशिवाय आमदार निवडण्याचा पर्याय विद्यमान आमदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्ट केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे की ज्या उमेदवाराच्या माथ्यावर श्री दामोदराचा हात तोच आमदार म्हणून निवडून येणार आहे. यापूर्वी देव बोलतात व काय करायचे ते देवच सांगतात हे मडगावकर ऐकून होते. पण आता निवडणुकीच्या वेळी श्री दामोदर प्रत्यक्ष अवतरणार व कुठल्या तरी एका उमेदवाराच्या डोक्यावर हात ठेवणार, असे बाबाकडून अर्थात दिगंबर कामतांकडून सांगण्यात आले. काही वर्षांपूर्वी गणपती दूध पितो, तसेच कोंब मडगाव येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रखुमाईचे केस पांढरे झाले अशा गोष्टी पसरविल्या गेल्या व ते पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. आता श्री दामोदर प्रत्यक्ष अवतरणार म्हटल्यावर त्यांच्या चरण स्पर्शासाठी नक्कीच मडगावात लोकांची झुंबड उडेल, असे मडगावचे लोक बोलताहेत. ∙∙∙
गोव्यात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने उपेंद्र गावकर यांच्या नेतृत्वात हात पाय पसरायला सुरुवात केली, अशी चर्चा गेल्या काही दिवसांत सुरू झाली होती. मात्र, सध्या उपेंद्र गावकर हे त्यांच्या राज्यप्रमुखपदी निवडीनंतर गायबच झाले आहेत, राज्यातील कोणत्याही घडामोडीवर काहीच प्रतिक्रिया येत नसल्याने शिंदेंची शिवसेना गायब झाली की काय, असा सवाल काही शिवसैनिकांकडूनच विचारला जात आहे, आता बोला! ∙∙∙
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपमध्ये यावेत असे वाटणारा एक वर्ग सत्ताधारी वर्तुळात आहे. त्यांनी हा विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हाताळण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले आहे. अलिकडे काही मंत्री व राजकारण्यांनी गणेश चतुर्थीचे निमित्त साधत फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आहे. त्या भेटीवेळी काहींनी पार्सेकर यांच्यासह काही नेते भाजपमध्ये परत आल्यास पक्ष संघटना बळकट होऊ शकते, असा विचार मांडला होता. आता पार्सेकर यांनीही प्रस्ताव आल्यास विचार करू, असे सांगत एक पाऊल पुढे टाकल्याने तसेच पार्सेकर यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव असलेले दामू नाईक हे प्रदेशाध्यक्षपदी असणे फायद्याचे मानत हे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ∙∙∙
गोवा क्रिकेट संघटनेचा ‘बीसीसीआय’मध्ये प्रतिनिधी पाठवण्यासाठी शुक्रवारी दुपारी २ वाजता पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयातील बैठक बराच काळ चालली. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत बैठकीत नेमके काय घडले याविषयी गूढ कायम राहिले होते. रोहन गावस देसाई समर्थक मांडलेल्या ठरावाची प्रत मागत होते, तर संघटनेचे चालक आधी इतिवृत्तावर सही करा, मग ठरावाची प्रत देतो, असे सांगत राहिले. मैदानाबाहेरच्या या क्रिकेटमध्ये गुगली, चौकार, षटकार सारेकाही आपापल्या अंदाजात होते. वकीलांचाही प्रवेश झाला तरीही गुंता सुटला नाही. यामुळे क्रिकेट इतकेच संघटनांतील राजकारण क्लिष्ट असल्याचा प्रत्यय संबंधितांना आल्याशिवाय राहिला नाही. रोहन हे ‘जीसीए’च्या कार्यालयात तेव्हा नव्हते मात्र ते जिथे कुठे होते, तेथे त्यांचा जीव टांगणीला लागला होता, अशी चर्चा आहे. ∙∙∙
गोव्यात आयआयटी उभारण्यासाठी भाजप सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नाला आत्तापर्यंत अडथळेच येत आहेत. सहाव्यांदा जागा निश्चितीकरणापर्यंत येऊनही तो प्रकल्प पुढे जाईनाच झाला आहे, असे दिसते. त्यामुळे खरोखरच आयआयटी प्रकल्प जनतेला नको आहे की, केवळ राज्यकर्त्यांना हवा आहे, हे एकदाचे स्पष्ट करणे आवश्यक आहे. शिरोडा मतदारसंघातील कोडारच्या जागेविषयी सरकारने हरकती मागवल्या, त्यामुळे याही ठिकाणाला समस्या येणार हे स्पष्ट होते आणि झालेही तसेच. आयआयटीसाठी जागा निश्चित करण्याची वेळ आली असली तरी जमिनी स्तरावर त्याला विरोध करणारा गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे ज्या गावातून ‘आयआयटी’साठी प्रस्ताव येईल, त्याठिकाणीच तो उभारणे आवश्यक आहे. नाहीतर केवळ जागेचा शोध घेण्यावर अनाठायी लाखोंचा होणारा खर्च तरी वाचेल. ∙∙∙
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये मरण पावलेला विद्यार्थी ड्रग्स सेवनामुळे मृत झाला, हे उघड झाल्यानंतर आता गोव्यात विद्यालयांच्या दारापर्यंत पोचलेला अमलीपदार्थ हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वास्तविक गाेव्यातील कित्येक विद्यार्थी ड्रग्सच्या आहारी जात आहेत, हे या पूर्वीही उघड झाले होते. केपे आणि काणकोणसारख्या गावातही विद्यालयापर्यंत अमलीपदार्थ पोचले आहेत. मात्र, असे असतानाही प्रशासन याकडे काणाडाेळा का करते? यावर कुणी उत्तर देईल का? ∙∙∙
शिक्षक भरतीबाबत आता सरकार घोटाळा करीत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी केला आहे. प्रशांतबाब हे काणकोण येथील एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. येथे त्यांना सरकारकडून जो कटू अनुभव आला त्याचा पर्दाफाश त्यांनी शुक्रवारी मडगावात पत्रकार परिषदेत केला. सर्व काही सुरळीत झाले नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रशांत हे फॉरवर्डवाले आहेत. जे सांगणार ते प्रत्यक्षात कृतीत आणणे ही फॉरवर्डवाल्यांची खासियत आहे. आता सरकार त्यांचा इशारा किती गांभीर्याने घेतो हे बघावे लागेल. कारण विद्यमान सरकारचा कारभार ‘हम करे सो कायदा’ असाच आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.