

वास्को: मराठी भाषेला गोव्यात कोकणीबरोबर समान व राजभाषेचा दर्जा द्यावा, कोकणी परीक्षेची सक्ती तात्काळ रद्द करावी, सर्व उमेदवारांना समान संधी द्यावी. भाषेच्या नावाखाली भेदभाव सहन केला जाणार नाही. मराठी ही गोव्याची सांस्कृतिक ओळख असून तिचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम निर्धार मुरगाव निर्धार समितीतर्फे व्यक्त करण्या आला.
मराठी राजभाषा निर्धार समिती मुरगाव प्रखंडातर्फे शुक्रवारी (ता. ३१) आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
मुरगाव पालिका इमारतीसमोर झालेल्या या आंदोलनात मराठी राजभाषा निर्धार समितीचे केंद्रीय सदस्य नितीन फळदेसाई, लेखक नारायण महाले, समितीचे मुरगाव प्रखंडाध्यक्ष सुनील शेट, विजय हजारे, राजाराम पाटील, मिलिंद सावंत, रंगनाथ नाईक, चंद्रकला नाईक, कवी उध्दव पोळ, राजेश रेडकर, योगेश शेट तानावडे, मनोहर बेळगावकर,
सखाराम भगत, सविता सातार्डेकर, चारुशीला बेळगावकर, नारायण मांजरेकर, उदय फडते, विष्णू काणेकर, विठ्ठल किनळेकर, भक्ती खडपकर, समीर कुटवाळकर, मंगेश तुळसकर, अशोक मांजरेकर, रोहन राठोड, मनिषा नागवेकर, विशाखा फळदेसाई, अनुप्रीता गुरव, दीपिका कदम, आनंद गुरव, कृष्णराव बांदोडकर, अजित कांबळे, युवा प्रमुख नीरज राऊळ, यतीन बोरकर आदी उपस्थित होते.
नितीन फळदेसाई म्हणाले, गुणवत्तेला व शिक्षणाला दुय्यम स्थान देऊन केवळ भाषिक निकषावर उमेदवारांचे भविष्य ठरवणे हे शिक्षणाच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन आहे. हा निर्णय मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा आणि गोमंतकाच्या स्वाभिमानाचा घोर अपमान आहे. सरकारचे धोरण हे मराठी भाषिक तरुणांचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालला आहे.
सुनील शेट यांनी सांगितले, गोवा सरकार नवनवीन विरोधी धोरणे आखून मराठी भाषेला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्यातील मराठीप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन या अन्यायकारक धोरणाला विरोध करणे गरजेचे आहे
गोव्यात मराठी भाषेला शेकडो वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. लाखो विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण मराठी भाषेतून घेतलेल्या तरुण पिढीवर गोवा सरकार अन्याय करीत आहेत. मागच्या पाच वर्षांपासून मराठी भाषा गोव्यातून संपविण्याचा षडयंत्र आखले जात आहे, असा आरोप मराठीप्रेमी जनतेने म्हापसा येथील गांधी चौकात मराठी राजभाषा निर्धार समितीच्या धरणे आंदोलनात बोलताना व्यक्त केला.
शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी, म्हापसा शहरात भरपावसात मोठ्या संख्येने मराठीप्रेमी युवा, महिला, युवती व पुरुष मंडळींनी एकत्रित येत, सरकारने मराठी तरुणावर केलेल्या नोकरीवरील अन्यायाविरोधात धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला.
मराठी राजभाषा निर्धार समितीच्या बार्देश प्रखंडाचे अध्यक्ष नारायण राटवड यांनी सांगितले की, मराठी भाषा ही परकी भाषा नाही. ती भाषा गोमंतकाची आहे. हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली संस्कृती, साहित्य टिकवले आहे. नोकरीसाठी कोकणी भाषेची सक्ती करू नये.
निर्धार समितीचे केंद्रीय समिती सदस्य तुषार टोपले यांनी सांगितले की, हजारो वर्षांपासून गोव्यात मराठी भाषा आहे. याचे पुरावे मंदिरांमध्ये सापडणारे शिलालेख, लाखो वाचक मराठी वर्तमानपत्रे वाचतात.
किमान दोन हजारापेक्षा अधिकार मराठी नाटके सादर होतात. पहिले मराठी संगीतनाटक गोव्यात लिहिले गेले. पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणामध्ये मराठी भाषेचा वापर इतर भाषापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मराठी भाषेने संताचे अभंग जिवंत राहिले.
शुभा सावंत, मातृ शक्ती प्रमुख अॅड. रोशन सामंत, विनायक च्यारी, राजेश्री गडेकर, संदीप पाळणी, संगम चोडणकर, सुनील मेथर यांचीही भाषणे झाली. बार्देश मातृशक्ती प्रमुख अनुला बेळेकर, हेमंत दिवकर, शंशाक कामत, राजेश मराठे, विलास आमणेकर यांनी घोषणा दिल्या. सूत्रसंचालन अभय सामंत, तर आभार उमेश म्हालकर यांनी मानले. यावेळी मराठी राजभाषेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.