
पणजी: मराठीप्रेमींच्या निर्धार मेळाव्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित मराठी भाषिकांनी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ठाम निर्धार व्यक्त केला. मेळाव्याचे नेतृत्व मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. या मेळाव्यामुळे गोव्यातील मराठी आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले आहे.
मराठी राजभाषा निर्धार समिती, गोवा आयोजित मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा सोमवारी (ता.३१) इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात पार पडला. हजारो मराठीप्रेमींच्या उपस्थितीत मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी निर्णायक आंदोलनाची घोषणा करण्यात आली. मेळाव्याला प्राचार्य सुभाष वेलिंगकर, गो.रा. ढवळीकर, तुषार टोपले, अनुजा जोशी, प्रा. गजानन मांद्रेकर, नेहा उपाध्ये, प्रदीप आमोणकर यांसारख्या महत्त्वाच्या मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. अनुजा जोशी यांनी मराठी ही केवळ साहित्याची भाषा नाही तर शिक्षण, नाट्य, परंपरा, संस्कृती आणि समाजजीवनाशी निगडित आहे. मराठी राजभाषा झाल्याशिवाय गोव्याच्या मराठीप्रेमींचा संघर्ष थांबणार नाही. मराठीप्रेमींची हजारोंच्या संख्येत उपस्थिती पाहून मराठी राजभाषा निर्धार समितीचे हे आंदोलन यशस्वी होणारच, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, त्यांनी मराठीविषयक उपक्रमांसाठी व्हॉट्सॲप गट तयार करण्याचे आवाहनदेखील सर्वांना केले.
तुषार टोपले यांनी स्पष्ट केले की, मराठी ही गोमंतकाची राजभाषा असूनदेखील एकही आमदार मराठीतून बोलत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. मराठी भाषेच्या अनादराचा निषेध करीत टोपले यांनी सर्व आमदारांना मराठीतून बोलण्यास भाग पाडण्याची घोषणा केली. मंदिरांचे इतिवृत्त आणि ताम्रपट मराठीत आहेत, मग आमदारांना मराठीचा अभिमान का नाही? युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आंदोलनात सामील होऊन सरकारला मराठी राजभाषा करण्यास भाग पाडले पाहिजे. या आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन टोपले यांनी यावेळी केले.
प्रदीप घाडी आमोणकर यांनी सांगितले की, मराठीला जो अभिमानाचा दर्जा मिळाला आहे, तो केवळ आंदोलनातून मिळाला आहे. चार पिढ्या बरबाद झाल्या; पण मराठी ‘आत्मस्वर’ राहिला. आज ज्या भाषेला काही भविष्य दिसत नाही, त्या भाषा जबरदस्तीने शिकविल्या जातात. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मराठी ही गोव्याचा ‘आत्मस्वर’ राहिली आहे.
गोवा राज्यातील मराठी भाषेच्या राजभाषा दर्जाच्या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात गोपाळ रा. ढवळीकर यांनी परखड भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील या मेळाव्याने मराठी भाषेसाठी निर्णायक आंदोलनाची चळवळ उभी केली आहे. मराठीसाठी आंदोलन करणे हे दुर्दैवाचे लक्षण आहे; कारण मराठी ही गोव्यातील पारंपारिक आणि सांस्कृतिक भाषा आहे. मुक्तीपूर्व काळात गोव्यात मराठीत संवाद होत असे. त्यावेळी १८० ग्रामपंचायतींपैकी १२० ग्रामपंचायतींनी मराठीला राजभाषा मान्य करण्याचा ठराव मंजूर केला होता. ११ नगरपालिका असून त्यातील ७-८ नगरपालिका मराठी राजभाषेच्या ठरावाच्या बाजूने होत्या. ‘गोमन्तक’ या मराठी वृत्तपत्रासह मराठी वृत्तपत्रे अस्तित्वात होती, तर कोकणीचा वापर केवळ बोलीभाषा म्हणून होत होता. तरीही मराठीला वगळून कोकणीला राजभाषा दर्जा देण्यात आला, हा अन्याय दूर करावा.
युवा कार्यकर्त्या नेहा उपाध्ये यांनी मराठी व कोकणीकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त केला. आमची पिढी इंग्रजी प्रभुत्वाची नाही, तर पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारी आहे. मराठी बोलताना आजही हिणवले जाणे हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. गजानन मांद्रेकर यांनी सांगितले की, मराठी व कोकणी भाषांमध्ये वाद नसून तो एक विवाद आहे. ‘कोकणी राजभाषा काढा’ असे म्हणण्याऐवजी मराठीलाही राजभाषा दर्जा द्या, अशी आमची मागणी आहे. खरेतर कोकणी आणि मराठीमध्ये हा विवाद असणे बरोबर नाही; पण आम्ही आपापसातच भांडत आहोत आणि त्याचा फायदा इंग्रजीला होत आहे. दोन्ही भाषांनी इंग्रजीचा प्रभाव कमी करण्यासाठी एकत्र काम करणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.