म्हापसा, गरजवंताला आवश्यक दान करणे हेच सत्कर्म मानले जाते आणि रक्तदान हेच श्रेष्ठादान, असे म्हटले जाते. अपघातग्रस्त किंवा आजारी व्यक्तीचा जीव वाचविणारे रक्तदान खऱ्या अर्थाने श्रेष्ठदान असते.
याच भावनेने मागील १५ वर्षे पार्से-पेडणे येथील स्मिता भरत पेटकर (५४) या वर्षातून दोनवेळा नियमितपणे रक्तदान करतात. संत निरंकारी मिशनच्या अनुयायी असलेल्या स्मिता यांना याच संस्थेमुळे रक्तदानाची प्रेरणा मिळाली, असेही त्या अभिमानाने सांगतात. २००८ पासून त्या रक्तदात्या आहेत. जागतिक ‘रक्तदाता दिन’ दरवर्षी १४ जून रोजी पाळला जातो. यानिमित्त रक्तदात्या असलेल्या स्मिता पेटकर यांच्याशी गोमन्तकने साधलेला हा संवाद.
अनेक प्रकारच्या आजारात व विकारात रुग्णांना रक्ताची गरज भासते. मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नसते किंवा दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांना प्रेरणा मिळावी, या शुद्ध हेतूने रक्तदान करावे. ज्या रुग्णाला रक्त दिले जाते, त्यालाच रक्तदानाचा लाभ होतो असे नाही.
त्याउलट रक्तदान करणाऱ्यालाही फायदा होतो. गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. तुमच्या शारीरिक नियमिततेला कुठलीही बाधा पोहोचत नाही. तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्त कमी होईल, मी अशक्त होणार हा गैरसमज कुणीही मनात बाळगू नये. त्याशिवाय नवीन रक्त तयार झाल्याने रक्ताभिसरण उत्तम राहते, तुम्ही निरोगी राहता, असे पेटकर म्हणाल्या.
एका रक्तदानातून तिघांचे प्राण वाचतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते, शरीरातील संचित कॅलरीजचे प्रमाण कमी होते. रक्तदाब, कोलेस्टेरॉल होण्याचे प्रमाण कमी होते. मागील १५ वर्षे मी नियमित रक्तदान करत असल्याने माझ्या शरीरात वेगळीच ऊर्जा व चेहऱ्यावर तेज पाहायला मिळते. लोकसेवा करण्याची संधी मला माझ्या कृतीतून मिळते. तसेच शब्दांत व्यक्त न होणारी अनुभूतीही मिळते.
- स्मिता पेटकर, रक्तदात्या
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.