
म्हापसा: गणेश चतुर्थी उत्सवाच्या तोंडावर चिखली, कोलवाळ भागात मागील पाच दिवसांपासून नळ कोरडे पडल्याने पाण्याअभावी लोकांचे हाल सुरू आहेत.
दरम्यान, जलवाहिनीमधील अडथळे शोधण्याचे प्रयत्न सुरू असून बिघाड सापडल्यानंतर ते दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.
कोलवाळ येथील स्वयंभू मठाजवळ जलवाहिनीला सहा महिन्यांपूर्वी गळती लागली होती. पाणी पुरवठा विभागाने २२ रोजी ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले व दोन दिवसांत हे काम पूर्ण करीत जलवाहिनी दुरुस्त केली.
मात्र, त्यापासून चिखली गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभमध्ये पाणी येणे बंद झाले. परिणामी या भागातील पाणी पुरवठा खंडित झाला. गेले पाच दिवस नळाला पाणी येत नसल्याचे टँकरची व्यवस्था करून पाण्याची सोय करावी लागत आहे.
सोमवारी अधिकाऱ्यांनी जलवाहिनीतील बिघाड शोधून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र चिखली जलकुंभामध्ये आवश्यक दाबापेक्षा एकदम कमी दाबाने पाणी पडू लागले आहे. तीन तासांत भरणाऱ्या जलकुंभाला आता ८ तास लागत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाल्याने सुमारे २०० घरांना याचा फटका बसला असून लोक पाणी कधी येईल, या प्रतीक्षेत आहेत.
सरपंचांकडून पाठपुरावा
सरपंच दशरथ बिचोलकर यांनी सांगितले की, गावातील पाणीपुरवठा खंडित झाल्याने आम्ही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याची विनंती केली आहे.
नळाला पाणी नसल्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. गणेश चतुर्थीचा सण असल्याने लोकांची गरज पाहून खात्याने ही समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी सरपंच दशरथ बिचोलकर यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.