

पणजी: बहुचर्चित मंदार सुर्लकर अपहरण आणि खून प्रकरणातील आरोपींची अकाली सुटका होणार की नाही, ही कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकरणातील दोषी रोहन धुंगट, जोविटो रायन पिंटो आणि शंकर तिवारी यांच्या मुदतपूर्व सुटकेच्या शिफारशीविरोधात आणि समर्थनार्थ दाखल झालेल्या एकूण ४ याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात (Goa Bench) सलग सुनावणी पार पडली.
नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार न्यायालयाने आरोपी (दोषी) आणि पीडित पक्ष अशा दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांना अंतिम लेखी युक्तिवाद आणि समर्थनार्थ महत्त्वाचे न्यायालयीन निकाल रेकॉर्डवर आणण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. या प्रकरणाची सोमवारी (ता. १३) दुपारी ४.३० वाजता पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
न्यायालयाने सर्व याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतली. आरोपींच्या/दोषींच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे य त्यांना आपली बाजू भक्कमपणे मांडता यावी, यासाठी त्यांच्या वकिलांना विशेष वेळ दिला आहे.
या प्रकरणात सुरू असलेला हा कायदेशीर लढाईचा तिसरा टप्पा आहे. २०२१ आणि २०२४ मधील कायदेशीर घडामोडींनंतर आता मे २०२५ मध्ये राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने पुन्हा दोषींच्या सुटकेची शिफारस केली आहे. परिस्थितीमध्ये कोणताही ठोस बदल झालेला नसताना केवळ प्रोबेशन ऑफिसर्सच्या अहवालाचा आधार घेऊन मंडळाने घेतलेल्या या निर्णयावर पीडित पक्षाने पक्षपाताचा आरोप केला आहे.
आता सर्व पक्षांनी सादर केलेले लेखी युक्तिवाद आणि न्यायालयीन निकाल अभ्यासल्यानंतर, उच्च न्यायालय यावर काय निर्णय देते आणि ‘पीडिताच्या कुटुंबाच्या आवाजाला’ व ‘दोषींच्या सुधारणावादाला’ कायदेशीर चौकटीत कसे तोलते, याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. सोमवारी (ता.१३) दुपारी ४.३० वाजता न्यायालय यावर पुढील निर्देश देणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.