Mahadayi Water Dispute: जीवनदायिनी ‘म्हादईबचाव’साठी विधानसभा, लोकसभेत चर्चा करा

आपल्या आमदार, मंत्री आणि खासदारांमार्फतच विधानसभा किंवा लोकसभेत म्हादई विषयावर सविस्तर चर्चा व्हायला हवी, असे आवाहन पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केले.
Mahadayi Water Dispute In Goa
Mahadayi Water Dispute In Goa Dainik Gomantak

Mahadayi Water Dispute: म्हादईचे पूर्ण पाणी पळवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला असून त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आता आपल्या आमदार, मंत्री आणि खासदारांमार्फतच विधानसभा किंवा लोकसभेत या विषयावर सविस्तर चर्चा व्हायला हवी.

म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवू नये आणि गोव्याची ही जीवनदायिनी अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा विधानसभेच्या माध्यमातून जर प्रभावी चर्चा करून योग्य निर्णय घेतले तर न्यायालयामार्फतच आपण जिंकू शकतो, असे सांगून गोमंतकीयांनी या विषयावरून एकसंध व्हावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केले.

फोंड्यातील बसस्थानकावर मंगळवारी फोंडा सिटिझन ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सभेला लोकांची लक्षणीय उपस्थिती होती. या सभेला प्रमुख वक्ते प्रा. राजेंद्र केरकर यांच्यासमवेत के. डी. साधले, फोंडा पालिकेचे नगरसेवक शांताराम कोलवेकर तसेच फोंडा सिटिझन ग्रुपचे सुनील देसाई उपस्थित होते. सूत्रसंचालन उदय डांगी यांनी केले.

Mahadayi Water Dispute In Goa
Goa Government: राज्य सरकार प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली

केरकर म्हणाले, म्हादईचा हा विषय आजकालचा नसून गेली अनेक वर्षे हा विषय गाजत आहे. आपण या विषयावर अभ्यास आणि भ्रमंती करून नेमके काय प्रकरण आहे, हे शोधून काढले आणि तत्कालीन सरकारला त्याची जाणीव दिली. लेखाद्वारे आणि सभा बैठकांतूनही आपण म्हादईचा विषय किती गंभीर आहे, ते मांडले.

पण दुर्दैवाची बाब म्हणजे गोमंतकीयांनी हा विषय सहजपणे घेतला, त्यामुळेच आज म्हादई गोमंतकीयांच्या हातून निसटत असल्यामुळे सगळेच जागे झाले आहेत. काहीजण हा विषय राजकारणाचा करीत आहेत,

मात्र माझ्या मते आपण निवडून दिलेल्या आमदारांमार्फतच विधानसभेत या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घ्यायला हवा. विधानसभेच्या माध्यमातून म्हादईची गोव्याला किती आवश्‍यकता आहे, ते न्यायालयाला आणि केंद्राला जाणीव करून देण्याची खरी गरज आहे.

Mahadayi Water Dispute In Goa
Goa Government: हे सरकार ''इव्हेंट मॅनेजमेंट सरकार''

आमदार हे आपले लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधींनीही लोकांच्या मताचा आदर करूनच वागले पाहिजे, तरच म्हादईचा विषय मार्गी लागू शकतो. म्हणूनच रस्त्यावर उतरण्यापेक्षा म्हादईवरून आमदार, मंत्र्यांना कायम जाब विचारा, त्यामुळे विधानसभेतूनच हा विषय मोठा होऊ शकतो, असे स्पष्ट मत राजेंद्र केरकर यांनी मांडले.

सभेचे निमंत्रक सुनील देसाई यांनी प्रास्ताविकात म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे आणि तिला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगून राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने या विषयावरून एकसंध व्हावे, असे आवाहन केले. किस्तोद डायस यांनी म्हादईवरील सुंदर गीत सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com