कुंकळ्ळी, मडगाव आणि फातोर्ड्याच्या यशस्वी ‘रोड शो’ नंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी उशिरा कुंकळ्ळीत जल्लोषी सभा घेतली. भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या सभेत दोन्ही हात उंचावून घोषणा देत उपस्थित जनसमुदायाने केला.
आजवर कुंकळ्ळीतील राजकीय सभेला एवढी गर्दी कधी झाली नव्हती असे जाणकारांचे म्हणणे होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा हा मतदारसंघ असल्याने या सभेची अधिक चर्चा झाली. भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी आपण व आपले कुटुंब आधीपासूनच समाजसेवेत असल्याचे सांगितले.
राजकारणातून समाजसेवा व देशसेवा करणे याच उद्देशाने आपण राजकारणात आल्याचे पल्लवी म्हणाल्या. भाजपाने महिला सशक्तीकरणाचा विडा उचलला असून मतदारांनी आपल्याला खासदार म्हणून निवडून देऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट करावे, असे आवाहन केले.
आमदार दिगंबर कामत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने केलेल्या विकासकामांबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्या घणाघाती भाषणात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर टीका केली.
माजी मंत्री आरेसियो डिसोझा, माजी आमदार क्लाफास डायस, दीपक खरगटे, सुदेश भिसे, संतोष फळदेसाई यांचीही भाषणे झाली.
‘कुंकळ्ळीच्या उठावाला राजमान्यता’
मुख्यमंत्री म्हणाले, कुंकळ्ळीच्या ऐतिहासिक उठावाचा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून कुंकळ्ळीच्या उठावाला राजमान्यता देण्याचे काम माझ्या सरकारने केले आहे. साठ वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसला ते का शक्य झाले नाही. केवळ मतांसाठी कुंकळ्ळीकरांना क्रांतिकारी म्हणून दिशाभूल करण्याशिवाय काँग्रेसने काय केले? आजपर्यंत कुंकळ्ळीवासीयांना काँग्रेसने फसविले, आता फसवून घेऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
‘विकासाचे श्रेय काँग्रेसने घेऊ नये’
कुंकळ्ळी मतदारसंघात जो विकास होत आहे, तो भाजप सरकारमुळे होत आहे. याचे फुकटचे श्रेय काँग्रेसच्या आमदारांनी घेऊ नये. काँग्रेस पक्ष आज नेतृत्वहीन, दिशाहीन व विकासशून्य झाला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी येत नाहीत. मात्र, कुत्रा नेण्यासाठी गोव्यात येतात, त्या नेत्याकडे देश सांभाळणे शक्य आहे का? ज्यांना दिशा नाही व दूरदृष्टी नाही तो नेतृत्वहीन पक्ष देशाला सक्षम नेतृत्व देवू शकतो का? याचा विचार मतदारांनी करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
‘एनआयटीत स्थानिकांना प्राधान्य’
एनआयटीत अजून पूर्ण भरती झाली नसून येणाऱ्या काळात जेव्हा एनआयटीत नोकऱ्या जाहीर होणार, तेव्हा स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत होणारे प्रदूषण हे काँग्रेसचे कर्म असून भाजपचे राज्य सरकार प्रदूषणाला लगाम घालण्यास ठोस कृती करणार आहे.
माझ्यासाठी कुंकळ्ळी प्रिय असून क्रांतिकारी कुंकळ्ळीकरांवर अन्याय होईल अशी कोणतीही कृती माझ्याकडून होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.