
सासष्टी: विकासाच्या नावावर सरकारकडून निकृष्ट काम कसे केले आहे याचे एक-एक उदाहरण समोर येत आहे. कला अकादमीनंतर मडगावच्या रवींद्र भवनची दुरुस्ती, रस्त्यांची दुर्दशा, रेल्वे उड्डाणपुलाची खचलेली माती व आता नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममधील गळती. सलग चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सरकारने केलेल्या विकासावर प्रकाश टाकणाऱ्या घटना घडत आहेत.
नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमच्या छपरावर जिथे एक्जोस्ट पंखे आहेत तिथून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे बॅडमिंटन फ्लोअर खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाय या फ्लोअरवर खेळताना खेळाडू घसरून पडून दुखापत झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. गेल्यावर्षीही पावसात अशीच गळती झाली होती व नंतर दुरुस्ती करण्यात आली; पण जी दुरुस्ती केली तीही व्यवस्थित केली नसावी ते यंदाच्या गळतीवरून स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी वकिलामार्फत संबंधित सरकारी खात्याला नोटीस पाठवली आहे. जर सात दिवसांमध्ये दुरुस्ती झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असे नोटीसीत म्हटले आहे.
स्टेडियममधील फ्लोअर विदेशातून आयात करण्यात आला आहे. पावसामुळे तो ओबड-धोबड होण्याची शक्यता आहे. जर हे फ्लोअरिंग खराब झाले तर दुरुस्त करणे अशक्य आहे. त्यासाठी त्याची व्यवस्थित देखरेख करणे आवश्यक आहे. सध्या सरकार केवळ दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. रवींद्र भवनप्रमाणे या इनडोअर स्टेडियमचीही दुरुस्ती करण्याचा सरकारचा डाव आहे का, असा प्रश्न सावियो कुतिन्हो यांनी उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.