
पणजी: नावे, आडनावांतील अक्षरांच्या तफावतीमुळे लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत अनेकांचे अर्ज प्रलंबित राहत असून, याला महिला आणि बाल कल्याण खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याचा दावा आमदार गोविंद गावडे यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना केला.
त्यावर आपण खात्याचा मंत्री असल्याने याची जबाबदारी आपली असून अधिकाऱ्यांची नाही, असे म्हणत महिला आणि बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी प्रलंबित अर्जांना लवकरात लवकर मान्यता दिली जाईल, अशी हमी सभागृहाला दिली.
लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या नावांमध्ये किंवा आडनावांमध्ये तफावत आढळल्यानंतर महिला आणि बाल कल्याण खात्याचे अधिकारी त्यांच्याकडून ‘डायव्हर्जन प्रमाणपत्र’ मागतात. असे प्रमाणपत्र मिळणे कठीण असल्यामुळे अनेकांचे अर्ज दहा ते तेरा वर्षांपासून प्रलंबित आहेत.
नावांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये अशा पद्धतीच्या चुका काढून अधिकारी जाणीवपूर्वक अर्ज प्रलंबित ठेवत आहेत. असे अधिकारी त्या ठिकाणी काम करण्यासाठी पात्र आहेत का, असा सवाल आमदार गावडे यांनी उपस्थित केला. त्यावर महिला आणि बाल कल्याण खात्याचा मंत्री आपण असल्यामुळे ही जबाबदारी आपली आहे. याबाबत आपण अधिकाऱ्यांना दोष देणार नाही. जे अर्ज प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर निकाली काढले जातील, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी दिली.
लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी करून त्यांना मान्यता देण्यासाठी समिती असते. आतापर्यंत जे अर्ज विविध कारणांमुळे प्रलंबित राहिले आहेत ते अर्ज समितीच्या पुढील बैठकीत घेऊन ते मंत्र्यांनी निकाली काढावेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.