
पणजी : गोव्यातील टपाल कार्यालयांमध्ये ग्रामीण डाकसेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोकणी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. अर्जदारांनी दहावीपर्यंत कोकणी किंवा मराठी यापैकी एक विषय शिकलेला असावा. शिवाय ज्या उमेदवारांनी दहावीपर्यंत केवळ मराठीतून शिक्षण घेतलेले आहे, त्यांना कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या टपाल विभागाने याबाबतची अधिसूचना जारी कली आहे.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने दहावीपर्यंत कोकणी विषय शिकलेला नसल्यास, त्याला कोकणी भाषेचे ज्ञान आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. अशा उमेदवारांना गोवा कोकणी अकादमी किंवा गोवा सरकारने या उद्देशासाठी अधिकृत केलेल्या कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, गोव्यात कार्यरत असलेल्या डाक सेवकांना कोकणी भाषा अवगत नसते. त्यामुळे स्थानिकांना आलेली पत्रे तसेच पोस्टाने आलेली कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे गोव्यातील डाक सेवकांना कोकणी भाषा सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी गत पावसाळी अधिवेशनात केली होती. महाराष्ट्रात ३.५० लाख रुपये भरून पोस्टमन होता येते, असा दावाही त्यांनी केला होता. त्यावर गोव्यासाठी नेमण्यात येणाऱ्या डाक सेवकांना कोकणी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करण्याची हमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती.
आमची भाषा आमची ओळख : विजय
गोव्यातील डाक सेवकांना कोकणी भाषा सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी आपण पावसाळी अधिवेशनात केली होती. आमची भाषा आमची ओळख आहे. टपाल विभागाच्या या निर्णयामुळे टपाल खात्यात गोमंतकीयांसाठी असलेल्या नोकऱ्या त्यांच्या हातात राहतील याची खात्री निर्माण झाली, अशी प्रतिक्रिया आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
अखेर गोमंतकीयांना न्याय : परब
‘आरजी’ चे मनोज परब म्हणाले, महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या डाकसेवकांना गोव्यात पत्रे पोहोचवतांना भाषेची समस्या येत असे, गोमंतकीयांना नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही जे प्रयत्न केले होते त्याला यश मिळाले आहे. अजूनही ज्या काही मागण्या आहेत त्या देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या निर्णयामुळे गोमंतकीयांना न्याय मिळाला ओह.
मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्वागत
टपाल विभागाने गोव्यासाठी ग्रामीण डाक सेवकांची भरती करताना कोकणी आणि मराठी भाषा अनिवार्य केल्याच्या निर्णयाचा गोमंतकीय तरुणांना फायदा मिळेल. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत गोमंतकीयांना प्राधान्य मिळेल. तसेच, राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी टपाल विभागाच्या निर्णयाचे स्वागत केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.