Kala Academy :
पणजी, कला अकादमी कलाकारांना पूर्वीप्रमाणे सुस्थितीत मिळावी, यासाठी एकत्रित आलेल्या राज्यातील कलाकारांच्यावतीने आता आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे.
त्यासाठी ‘कला राखण मांड, गोवा’ या समितीची स्थापना करण्यात आली असून मंगळवारी (२ जुलै) सकाळी अकरा वाजता अकादमीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनास प्रारंभ करणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक देविदास आमोणकर यांनी जाहीर केले.
श्रमशक्ती भवनातील गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या कार्यालयात शनिवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमोणकर यांनी ‘कला राखण मांड'' या समितीची स्थापना झाल्याचे आणि तिचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी समितीचे सहनिमंत्रक राजदीप नाईक आणि सचिव सिसील रॉड्रिग्स यांची उपस्थिती होती.
आमोणकर म्हणाले, १७ जून रोजी कलाकारांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या बैठकीला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची उपस्थिती होती. आमचा कोणाही विरोधात राग नाही, कला व संस्कृती मंत्रिपद हे गावडे यांच्याकडे आहे, त्यामुळे कला अकादमीविषयी प्रश्न त्यांना विचारलाच जाणार, उद्या तेथे कोणीही मंत्री आला तरी त्यांना तेच प्रश्न केले जातील.
कला अकादमीचा एक सभागृह खुला झाला पण त्यात कलाकारांना दोष दिसून आले आहेत. अजूनही खुला मंच, कॅन्टीन खुले झालेले नाही. मागील बैठकीनंतर कलाकारांच्या दोन ते तीन बैठका झाल्या, त्यानंतर कालच्या (शुक्रवार) बैठकीत आंदोलनासाठी समिती नेमणे आवश्यक असल्याचा विचार पुढे आला आणि त्यानुसार ‘कला राखण मांड'' समितीची स्थापना झाल्याचे त्यांनी सांगितले.
कला राखण मांड समिती केवळ कला अकादमीसाठी कार्यरत राहणार नाही, तर राज्यातील रवींद्र भवन, राजीव कला मंदिराच्या प्रश्नांवरही आवाज उठवीत राहणार आहे. त्याशिवाय तालुकास्तरीय समितीत्याही स्थापन केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडे मंगळवारी आम्ही भेटून अकादमीवर झालेल्या खर्चाचा तपशील मागितला जाईल, त्यासाठी एक महिन्यांचा कालावधी सरकारला दिला जाणार आहे.
दक्षिण गोव्यातही कलाकारांची बैठक आयोजित केली जाणार आहे, त्याविषयी तारीख अद्याप निश्चित केली नसल्याचे आमोणकर यांनी नमूद केले. त्याचबरोबर कला अकादमीच्या न्याय हक्कासाठी जो कोणी आंदोलन करेल, त्यास या समितीचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी जाहीर केले.
सचिव सिसील म्हणाल्या, आपण राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवरील नृत्य कार्यक्रमापर्यंत जी मजल मारली ती कला अकादमीच्या व्यासपीठामुळेच. कला अकादमीचे व्यासपीठ हे भविष्यातील कलाकार घडविणारे आहे. अजूनही अकादमीचे अर्धवट काम बाकी आहे, ते आता कधी पूर्ण होणार आहे, हे माहीत नाही. अकादमी पूर्वीसारखी पुन्हा कलाकारांना मिळावी, असे सर्व कलाकारांचे म्हणणे आहे.
तियात्र कलाकारांनी साथ द्यावी!
कला अकादमीत खऱ्या अर्थाने सर्वात जास्त सादर होतात ते तियात्र. त्यामुळे तियात्र कलाकारांनीही आमच्या आवाहनाला साथ द्यावी, अकादमीला पूर्वीचे वैभव मिळावे यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन राजदीप यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.