
पणजी: कदंब परिवहन महामंडळाने आसगाव ते म्हापसा या मार्गावर अतिरिक्त बससेवा सुरू केल्या असून यामुळे विद्यार्थ्यांसह नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या राधाकृष्ण विजय साळगावकर यांच्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर कदंबने हे पाऊल उचलले आहे.
साळगावकर यांनी आसगाव–म्हापसा मार्गावरील प्रवासी वाहतुकीची कमतरता आणि प्रवाशांच्या हालअपेष्टा याकडे याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
सुनावणीदरम्यान, कदंब महामंडळाचे वकील शिवन देसाई यांनी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठास कळविले की, कदंबने २५ सप्टेंबरपासून या मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.
हा मार्ग विशेषतः शाळा–कॉलेजच्या गर्दीच्या वेळात अतिशय गजबजलेला असतो. त्यामुळे कदंब महामंडळ अधिक बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
तसेच, या विषयावर सर्व संबंधित पक्षांसोबत बैठक घेऊन स्थायी उपाययोजना करण्याचे आश्वासन महामंडळातर्फे देण्यात आले आहे. याचकाकरता राधाकृष्ण साळगावकर यांनाही त्या बैठकीबाबत पूर्वसूचना देण्यात येईल, असेही कदंब महामंडळाच्या वकिलांनी स्पष्ट केले.
खंडपीठाने कदंबकडून करण्यात आलेल्या कृती व दिलेल्या आश्वासनांचा स्वीकार करून पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे नमूद केले. साळगावकर यांनी स्वतःच न्यायालयात बाजू मांडली असून, एका नागरिकाच्या प्रयत्नांमुळे जनहितासाठी प्रत्यक्ष बदल घडून आल्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
· म्हापसा ते बाडे (आसगाव मार्गे): सकाळी ०७:२५ व ०७:३५ वाजता
· बाडे ते म्हापसा (आसगाव मार्गे): दुपारी २:३० व ४:०५ वाजता
२५ सप्टेंबरपासून या मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.