गोव्यातील ५२ किलोमीटर परिसरातील नदी-नाल्याचे अस्तित्व धोक्यात

Impact of Kalsa Bhandura on the tributaries of Mhadai river
Impact of Kalsa Bhandura on the tributaries of Mhadai river

खांडोळा: म्हादईची सुरवात खानापूर तालुक्‍यातील पर्वतभागातील देगावातून होते. गोव्यात येणाऱ्या पाण्याचा उगम कणकुंबी, तळेवाडी, हेमाडगा गावच्या परिसरातील छोटे नाले, अनेक छोट्या नद्यांतून होते. ही नदी सत्तरीतून खाली उतरते, तेथे ती म्हादई नाव धारण करते. पुढे ती खांडेपारजवळ मांडवी होते आणि पुढे मांडवीचा प्रवास पणजीपर्यंत होतो. तोपर्यत तिच्यात प्रामुख्याने सत्तरी, डिचोलीत, धारबांदोडा तालुक्यातून अनेक नद्या, नाले मिळतात.

पारवड, चोर्ला, कणकुंबी आणि गोव्यातील सुर्ल अशा चार गावांतील जंगलांतून एकेकाळी कळसा नाल्यात पाणी एकत्रित यायचे आणि हे पाणी सत्तरीतील नानोडाच्या दुसगीर या ठिकाणी कृष्णापूरमार्गे येणाऱ्या म्हादईशी एकरूप व्हायचे. नानोडा या नावाने कळसा नाला गोव्यात प्रसिद्ध असून १९९९ मध्ये म्हादई अभयारण्य म्हणून जो प्रदेश अधिसूचित करण्यात आला त्याला पाणीपुरवठा करण्याचे कार्य नानोडा युगायुगांपासून करत आहे. परंतु आता या नाल्यावरच कर्नाटकने घाला घातल्याने म्हादईचा जलस्रोतावर परिणाम जाणवू लागला आहे.

म्हादईची गोव्यात ५२ कि. मी. लांबी आहे तर कर्नाटकात ३५ कि. मी. लांबी आहे. या नदीत येणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला सीमाभागातच अडविल्याने पुढे गोव्यातील अंदाजे ५२ कि.मी. परिसरातील नदी क्षेत्रील नदीबरोबरच इतर नाल्यावरही परिणाम होणार असून येथील जैविकसंपत्तीबरोबरच शेतीव्यवसायही संकटात सापडणार आहे. यंदा फक्त कळसा नाल्याचेच पाणी मोठ्या प्रमाणात उलट दिशेने मलप्रभेत वळविल्याने परिणाम जाणवत आहेत. जर का इतर प्रकल्प मार्ग लागले तर खूपच दयनीय अवस्था होण्याची भिती आहे. त्यासाठीच सक्षमपणे उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्याची गरज आहे, असे मत पर्यावरवादी मधू गावकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, म्हादई व तिच्या उपनद्या यापासून शेतजमिनीसाठी पाणी मिळणाऱ्या क्षेत्रात गोव्यातील १५२०चौ. कि. मी. क्षेत्राचा समावेश आहे. गोव्याचे ४३ टक्के क्षेत्र मांडवी नदी खोऱ्यात मोडते. गोव्यातील जीवसृष्टी, निसर्ग व पर्यावरण यांच्या दृष्टीने विचार करता म्हादई-मांडवीचे महत्त्व केवढे आहे, याचा अंदाज सर्वसामान्यांनाही येऊ शकेल. जर कर्नाटकातून येणारे पाणी कमी झाले तर समुद्राचे खारे पाणी या पात्रातून पुढे येईल, त्याचे दुष्परिणाम वेगळेच होतील.

म्हादई ही जीवनदायिनी आहे. तिच्यावर पाच ते सहा तालुक्याची तहान भागते, शेतीसाठी याच नदीवर अवलंबून राहावे लागते. सीमावर्ती भागात कळसा, भांडुरा, हलतरा, इरती, बैल,पान शेरा व इतर छोट्या नाल्याची एक साखळी असून या साखळीतून पुढे पाणी सरळ नैसर्गिक मार्गाने गोव्यात म्हादईत येते. पण या नाल्यातील पाणी धरण बांधून किंवा अन्य मार्गाने मलप्रभेत वळविण्याचा उलटाप्रकार कर्नाटक शासनाने चार-पाच दशकापासून सुरू केला आहे. त्यामुळे गोव्यातील मांडवीला मिळणाऱ्या उपनद्यांचेही अस्तित्वही धोक्यात येणार आहे. सत्तरीतील डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रातील कोत्राची नदी, सांखळी परिसरातील वाळवंटी नदी आणि तळेखोल येथून चालू होणारी डिचोली नदी, नगरगाव-नानोडा, तांबडी सुर्ल, गुळेली परिसरातील रगाडो, तसेच दूधसागर या नद्या रेतीउपसा, कचरा, दगड, गाळ, सांडपाणी आणि अन्य काही घटक पात्रात सोडल्याने, तसेच पात्रांवर अतिक्रमण झाल्याने अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. गोव्यातील ६ तालुक्यांतून म्हादई नदी वहात असून या नदीतील पाणी अल्प झाले, तर त्याचे भीषण परिणाम होतील.

पाणी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी

पिण्यासाठी पाणी हवे, अशी मागणी करणाऱ्या कर्नाटकच्या नेहमीच्या ‘कर-नाटक'धोरणानुसार हे पाणी सीमाभागातील वैभवसंपन्न जीवन व गोव्यातील जीवनावर दुष्परिणामांचे चक्र ओढवून गदग, धारवाड, हुबळी परिसरात येऊ घातलेल्या मोठ्या कंपन्यांसाठी पाण्याची सोय करण्याचा कर्नाटकचा इरादा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com