
पुणे: नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक (१०५ टक्के) पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. गोव्यासह (Goa) महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी (ता. १५) मॉन्सून हंगामातील पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८७० मिलिमीटर आहे. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
मॉन्सून (Monsoon) हंगामातील पहिल्या टप्प्याचा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्वि-धृविता (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन हे घटक विचारात घेतले आहेत. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३३ टक्के), सरासरीइतक्या पावसाची शक्यता ३० टक्के आहे. तर दुष्काळाची शक्यता अवघी २ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय हवामान खात्याने मॉन्सूनविषयी एप्रिल महिन्यात वर्तविलेला अंदाज चारवेळा खरा ठरला आहे. गेल्यावर्षी हवामान खात्याने १०६ टक्के पर्जन्यमानाचे भाकीत वर्तविले होते आणि प्रत्यक्षात १०८ टक्के पाऊस पडला होता. केंद्र सरकारच्या वसुंधरा विज्ञान मंत्रालयाने २०२२ मध्ये निश्चित केलेल्या दीर्घकालीन सरासरीनुसार ८७० मिमी पर्जन्यवृष्टी सामान्य मानली जाते. हवामान खात्याकडून मे महिन्यात मॉन्सूनविषयीची माहिती अद्ययावत करण्यात येईल.
विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीवर असून, सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ‘ला-निना’ नाही, आणि ‘एल-निनो’ नाही अशी स्थिती आहे. उत्तर गोलार्धातील युरेशियामध्ये डिसेंबर ते मार्च दरम्यानच्या कालावधीत यंदा सरासरीपेक्षा कमी हिमाच्छादन होते. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) सध्या तटस्थ (न्यूट्रल) स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात आयओडी ही स्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ आणि तटस्थ स्थिती, युरेशियातील कमी हिमाच्छादन, हिंद महासागरातील धन आणि तटस्थ ‘आयओडी’ हे घटक मॉन्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल मानले जातात.
देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उन्हाळ्याची स्थिती असून एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याचे दिवस सर्वाधिक असतील. पारा वाढल्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर दबाव येईल आणि पाण्याचा तुटवडा जाणवणार असल्याचा इशारा महापात्रा यांनी दिला. मॉन्सूनच्या मोसमात पर्जन्यवृष्टीचे दिवस कमी होत चालले असून मुसळधार पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे दुष्काळ आणि पुराची स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.