Investigation: 'रसोई' या एका शब्दावरुन 4 कोटी फसवणूक प्रकरणातील जोडप्याला दिल्ली पोलिसांनी गोव्यात कशी अटक केली?

शाही पनीर, नान आणि डिलक्स थालीची ऑर्डर देत उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तळ ठोकून बसले होते.
Delhi Police Investigation
Delhi Police InvestigationDainik Gomantak

Delhi Police Investigation

Panjim Goa: शाही पनीर, नान आणि डिलक्स थालीची ऑर्डर देत उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तळ ठोकून बसले होते. हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या नावात रसोई शब्द असलेल्या विविध ठिकाणावरुन त्यांनी सलग काही दिवस फूड ऑर्डर केली.

दिल्लीत 4.11 कोटी रुपयांचा घोटाळा करुन गोव्यात लपलेल्या जोडप्याचा शोधात आर्थिक गुन्हे (Fraud Case) शाखेचे सहा पोलीस होते. जेवण मागविण्यासाठी त्यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशनचा वापर न करता थेट रेस्टॉरंटमधूनच ऑर्डर केली.

पोलिसांनी पाच फूड ऑर्डर दिल्यानंतर अखेर ते 'आंटी की रसोई' (Aunty ki Rasoi) या क्लाउड किचनपर्यंत पोहोचले, आणि 4.11 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील चार वर्षापासून फरार असलेल्या जोडप्याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक केली.

पोलिसांनी विकास शांडिल्य (48) आणि मीनाक्षी (43) या जोडप्याला अटक केलीय (Arrested In Goa). दोघेही पर्वरीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. दोघे येथूनच उत्तर भारतीय खाद्यपदार्थाचे हॉटेल चालवत होते. त्यांच्या हॉटेलच्या नावात रसोई हा एक शब्द होता आणि दिल्ली पोलिसांकडे पुरावा म्हणून एवढाच शब्द होता.

संशयित जोडप्याच्या शोधात दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) पथक उत्तर गोव्यात तळ ठोकून बसले होते. एका हॉटेलमध्ये थांबलेल्या पोलिसांनी ज्या हॉटेलच्या नावात रसोई शब्द असेल तेथून जेवण मागविण्यास सुरुवात केली. चार ऑर्डरनंतर पाचव्या ऑर्डरला ते 'आंटी की रसोई' या क्लाउड किचनपर्यंत पोहोचले.

प्रत्येक ऑर्डरनंतर एक पोलीस कर्मचारी डिलिव्हरी बॉयचा पाठलाग करायचा आणि हॉटेल मालक पाहीजे असणारे संशयित आहेत का? याची खातरजमा करत होता. पाचव्या ऑर्डरला पोलीस अपेक्षित हॉटेलपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे हे क्लाउड किचन पोलीस राहत असलेल्या हॉटेलपासून केवळ चार किलोमीटरच्या अंतरावर होते.

काय आहे फसवणूक प्रकरण?

अटकेत असणाऱ्या जोडप्याने सेवा ॲपेरेल्स या कंपनीच्या माध्यमातून NBFC तून कर्जाची मागणी केली होती. यासाठी त्यांनी दिल्लीतील 5 कोटी रुपये किमतीची मालमत्ता तारण म्हणून ठेवली होती.

बँकेने 31 ऑगस्ट 2017 रोजी 4.11 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणात अटक विकासचा भाऊ गौरव पत्नी मीनाक्षी आणि तिची आई - फर्ममधील भागीदारांची सह-कर्जदार म्हणून नावे आहेत.

जोडप्याने ज्या मालमत्तेच्या नावे कर्ज घेतले होते ती जमीन त्याच्या सासूने यापूर्वीच विकल्याचे तपासातून समोर आले आहे. कर्जासाठी सादर केलेली कागदपत्रे देखील बनावट असल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर विकासचा गौरव शर्मा भाऊच नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

2019 पासून फरार

जोडप्याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी यापूर्वी देखील प्रयत्न केला होता मात्र, दोघेही ओळख बदलून गोव्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहत असल्याने तपास आणि त्यांना अटक करण्यात अडथळा येत होता.

2017 साली दोघांनी मिळून फसवणुकीचा कट रचला होता असेही तपासून समोर आले आहे. दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाची सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com