
वाळपई: सत्तरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदी-नाल्यांची पातळी झपाट्याने वाढत असून, अंजुणे धरणाच्या चारही दरवाजे शुक्रवारी उघडण्यात आले आहे. सुदैवाने पूरस्थिती निर्माण झालेली नसली तरी, वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी, ठाणे सत्तरी येथील नाईकवाडा येथे साईबाबा मंदिराजवळ रुपेश मालुसरे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. या दुर्घटनेत घराचे कौले, फर्निचर व इतर वस्तूंचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. झाडामुळे घरात पाणी शिरले. मात्र, वाळपई अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे ७० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले.
शेळप येथील प्राथमिक शाळेजवळ आंब्याचे झाड, मोर्लेतील बागवाडा येथे नारळाचे झाड फुटपाथवर कोसळले. या सर्व ठिकाणी वाहतूक काहीवेळ ठप्प झाली.
घटनास्थळी वाळपई अग्निशमन दलाचे जवान प्रदीप गावकर, कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तत्परतेने पोहोचून झाडे हटवणे व मदतकार्य सुरू केले.
वाळपई येथील वन खात्याच्या इमारतीवरही आंब्याचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. छतावरील कौले फुटल्याने पाणी गळती झाली असून, इमारतीचे अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले. जवानांनी तातडीने बचावकार्य करून सुमारे १ लाखांची मालमत्ता वाचवली. धामशे येथील पुलाजवळ वीज वाहिनीवर झाड कोसळले, तर ब्रह्मकरमळी (वाळवंट) येथे रस्त्यावर व वीजवाहिनीवर काजूचे झाड पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.