
डिचोली: मराठीसाठी चाळीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र आजपर्यंत मराठीप्रेमींच्या पदरात निराशा पडली आहे. आता सहनशीलता संपली असून, निर्णायक आणि ‘आरपार’ लढाईची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, मराठीची अस्मिता टिकवून ठेवतानाच, मराठी ही राजभाषा व्हायलाच पाहिजे, तर मराठीप्रेमींनी ‘व्होट बॅंक’च्या माध्यमातून राजकारण्यांना आपली ताकद दाखवून देण्याची आज वेळ आली आहे,
मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे रविवारी हरवळे-साखळी येथे आयोजित मराठीप्रेमी कार्यकर्त्यांच्या प्रखंड मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य वेलिंगकर बोलत होते. हरवळे येथील खेडेकर सभागृहात आयोजित या मेळाव्याप्रसंगी मराठी राजभाषा निर्धार समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, शाणूदास सावंत, साखळी प्रखंड प्रमुख दामोदर नाईक, डिचोली प्रखंड प्रमुख बाबूसो सावंत, मधुकर शिंक्रे, गिरीश सावईकर आदी उपस्थित होते.
मराठी राजभाषा झालीच पाहिजे. अशी प्रतिज्ञा यावेळी मराठीप्रेमींनी केली. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडताना मराठीला राजभाषेचे स्थान मिळेपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार केला. मुकुंद कवठणकर यांनी प्रास्ताविक केले. बाबुसो सावंत यांनी स्वागत केले. आत्माराम गावकर यांनी प्रखंड समितीची घोषणा केली. बंद पडणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन बाबाजी गावकर यांनी केले.
मराठी हा गोमंतकीयांचा श्वास आणि ध्यास आहे. मराठीमुळेच संस्कृती टिकून आहे. मराठीमुळेच अनेक कलाकार घडले आणि मराठीची पताका जगभर फडकली आहे. हा वैभवशाली इतिहास नजरेसमोर असताना राजकारण्यांनी मराठीशी प्रतारणा केली, असे मत गो. रा. ढवळीकर यांनी व्यक्त करुन मराठीला तिचे हक्काचे स्थान मिळायलाच हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.