
पणजी: राज्यात अप्रेंटीसशिपच्या माध्यमातून युवकांमध्ये वर्क कल्चर वाढत आहे. परंतु अनेक खासगी कंपन्या अप्रेंटीसशिपवर तीन-चार वर्षे काम करून घेत केवळ १५ हजार रुपये देत आहेत. जर एखाद्या कंपनीने युवांना अप्रेंटीसशिपवर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्या कंपनीत सेवेत तर त्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी लागेल. तसे न केल्यास सरकार अशा कंपन्यांवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) राज्यातील पाच आयटीआयमध्ये टाटासमूहाच्या साहाय्याने उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ इक्सलन्सच्या पायाभरणी सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी टाटासमूहाचे दक्षिण भारत प्रमुख प्रशांत हंडीगुड, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, कौशल्यविकास संचालक एस. एस. गावकर, आयएमसी अध्यक्ष गौरीश धोंड व मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत हंडीगुड म्हणाले, कौशल्यविकासाच्या अनुषंगाने मनुष्यबळ निर्माण करणे गरजेचे आहे. आम्ही केवळ या उपक्रमाद्वारे उद्योगांना हवे असलेले मनुष्यबळच निर्माण करू इच्छित नाही तर रोजगार देणारे उद्योजक बनवू पाहत आहे.
जे विद्यार्थी आठवी आणि दहावीनंतर दोन वर्षे आयटीआय अभ्यासक्रमात प्रवेश घेतात, त्यांना दहावी आणि बारावी उत्तीर्ण करण्यासाठी सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे. त्यामुळे आठवीनंतर आयटीआय करणाऱ्यांना देखील एमटीएससाठी अर्ज करता येणे शक्य होईल. सोबतच, ज्या विद्यार्थ्याने दहावीनंतर दोन वर्षे आयटीआय पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांला कला, वाणिज्य किंवा इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तरीही घेता येईल. बारावी उत्तीर्णसाठी दोन भाषांचे पेपर द्यावे लागायचे. तेसुद्धा आता द्यायची गरज नाही.
टाटासमूहाच्या साहाय्याने सीएसआर निधीतून डिचोली, फर्मागुढी, वास्को, काकोडा आणि म्हापसा येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ इक्सलन्सची आभासी स्वरूपात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.
या पाच आययटीआयमध्ये उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ इक्सलन्सच्या उभारणी, साधनसुविधा, अभ्यासक्र व इतर बाबींसाठी टाटा टेक्नॉलॉजीकडून १६५ कोटी रुपये व सरकारचे मिळून सुमारे २०० कोटी रुपये लागणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होते, त्यांनी आयटीआय करावी अशी मानसिकता आहे. परंतु ती बदलणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वी फुटमायनद्वारे अत्याधुनिक वेल्डिंग अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक वर्ष जर्मनीत जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता येईल.
आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या ८५ टक्के विद्यार्थ्यांना हमखास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. परंतु शंभर टक्के रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.
बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून राज्यातील आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगारासाठी परदेशात संधी उपलब्ध करून देणार, जेणेकरून त्यांनाही मासिक लाखो रुपये कमाविण्याची संधी उपलब्ध होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.