
Panaji News : गोवा मुक्तिलढ्यात शहीद झालेल्यांपैकी १४ जणांच्या पहिल्या (हयात असणाऱ्या) वारसांचा राज्य सरकारच्या वतीने ६३ व्या मुक्तिदिनाचे औचित्य साधून प्रत्येकी दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. १८ डिसेंबर रोजी विधानसभेत हा सन्मान सोहळा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री निवासात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार १९ डिसेंबर रोजी ६३ वा मुक्तिदिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात येत होता; परंतु ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्यांच्या कुटुंबीयांची स्थिती बिकट असल्याचे निदर्शनास आले. त्यांना मदतीचा हात द्यावा, या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे.
१८ डिसेंबर रोजी विधानसभेच्या पीएसी सभागृहात सकाळी ११ वा. १५ शहिदांच्या पहिल्या वारसांचा (हयात असलेल्या) सन्मान करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १५ पैकी कर्नेल सिंग बेनिपाल (लुधियाना-पंजाब) यांच्या कुटुंबीयांना २७ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घरी जाऊन १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. उर्वरित १४ जणांचा प्रत्येकी दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन विधानसभेत सन्मान केला जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला गोवा मुक्तिलढ्याच्या चळवळीला उजाळा दिला. गोव्याला (Goa) पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी १५ ऑगस्ट १९५४ पासून चळवळ सुरू झाली. पीटर अल्वारिस यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली.
तर आल्फ्रेड अफान्सो, ॲन्थनी डिसोझा आणि मार्क फर्नांडिस यांनी तेरेखोल, पत्रादेवी आणि पोळे सीमारेषेवरून १५ ऑगस्ट १९५४ रोजी गोव्यात प्रवेश केला, तेव्हा त्यांना पोर्तुगिजांनी अटक केली आणि तेथूनच खऱ्या सत्याग्रहाला सुरुवात झाली. तत्पूर्वी, पुण्यात दी गोवा विमोचन साहाय्यक समितीच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही एकत्रित आले. त्यावेळी विविध राज्यांतून दहा हजार स्वातंत्र्यसैनिक गोव्यात प्रवेश करण्याच्या स्थितीत होते. पत्रादेवी येथून अडीच हजार सत्याग्रही गोव्यात प्रवेश करणार होते.
तेव्हा मध्य प्रदेशमधील सहोद्रादेवी हे या गटाचे नेतृत्व करीत होते. त्यांनी सहकारी चितळे यांच्या मदतीने गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोर्तुगीज पोलिसांनी गोळीबार केला, सहोद्रादेवी यांच्यावर झाडलेली गोळी युवा सत्याग्रही कर्नेल सिंग बेनिपाल या युवकाने आपल्या अंगावर घेतली. त्यावेळी ७० जणांना हौतात्म्य आले. त्यात ३० जणांचा पत्रादेवीत मुक्तिलढ्यात देशातील विविध राज्यांतील स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग होता.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याची ४० जणांची यादी राहिली आहे. एकाच कुटुंबातील दोन-तीन जणांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या जागा रिक्त होताच त्यांना त्या दिल्या जातील. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांच्या नोकरीचे धोरण व्यवस्थित नव्हते. त्यामुळे एक-एकजणाने तीन नोकऱ्या स्वीकारल्या होत्या. मी मुख्यमंत्री झाल्यावर या धोरणात बदल केला आणि एकदा नोकरी स्वीकारल्यानंतर त्याला दुसरी नोकरी स्वीकारता येणार नाही, असे धोरण राबविले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बाळा मापारी (अस्नोडा-बार्देश)
बसवराज हुडगी (वगडळ, बिदर- कर्नाटक)
शेषनाथ वाडेकर (नाशिक-महाराष्ट्र)
तुळशीराम हिरवे (कुलाबा-महाराष्ट्र)
बाबूराव थोरात (चंद्रपूर-महाराष्ट्र)
सखाराम शिरोडकर (एकोशी-पोंबुर्फा)
रोहिदास मापारी (अस्नोडा-बार्देश)
यशवंत आगरवाडेकर (शिवोली-बार्देश)
रामचंद्र नेवगी (डिचोली)
बापू विष्णू गवस (चांदेल-पेडणे)
बाबला परब (मोपा-पेडणे)
लक्ष्मण वेलिंगकर (वेलिंग-फोंडा)
केशवभाई टेंगसे (काणकोण)
परशुराम आचार्य (पैंगीण-काणकोण)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.