
पणजी: गोव्याची निसर्गरम्य किनारपट्टी सध्या संकटात आली आहे. गेल्या पाच वर्षांतील अभ्यासानुसार राज्याच्या ५६ टक्के किनारपट्टीची धूप झाली असून, हा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही बाब केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही चिंतेची ठरत आहे.
गोव्याला (Goa) एकूण १९३.९५ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. ‘शोरलाईन चेंज मॅपिंग ऑफ गोवा कोस्ट’ या अभ्यास प्रकल्पामार्फत गोव्याच्या किनारपट्टीवरील बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे. हे काम चेन्नई येथील राष्ट्रीय शाश्वत किनारी व्यवस्थापन केंद्राने गोवा राज्य पर्यावरण व हवामानबदल विभागाच्या वतीने हाती घेतले होते.
या अभ्यासातून स्पष्ट झालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात (North Goa) धूप होण्याचा परिणाम अधिक तीव्र असून मागील पाच वर्षांत त्यात २२ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर स्थिर किनारा क्षेत्र १८ ते ३० टक्क्यांनी घटले आहे. याचा थेट परिणाम मासेमारी, पर्यटन आणि स्थानिक जीवनशैलीवर होऊ लागला आहे. दाट लोकवस्ती आणि पर्यटनामुळे मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे धूप अधिक वेगाने होत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांचीही धूप होण्याचे प्रमाण २५ ते २९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विशेषतः काणकोण आणि सासष्टी भागात हे प्रमाण अधिक दिसून येते. मात्र सासष्टीमध्ये काही प्रमाणात वाळूची भर घालण्यात आल्याने तेथे किंचित दिलासा देणारी बाब ठरत आहे.
उत्तर गोवा: पेडणे तालुका : एकूण किनारपट्टी लांबी : १८.३१ किमी. धूप : ७.५१-८.४२ किमी (४१ ते ४६%); वाळू भर : ०.५५-२.२० किमी (३ ते १२%)
बार्देश तालुका : एकूण लांबी : २२.१७ किमी. धूप : ४.२१-५.५४ किमी (१९ ते २५%); वाळू भर : ३.५५-३.७७ किमी (१६ ते १७%)
तिसवाडी तालुका : एकूण लांबी : १९.७८ किमी. धूप : १.१९-२.७७ किमी (६ ते १४%); वाळू भर : ३.५६-५.५४ किमी (१८ ते २८%)
दक्षिण गोवा: मुरगाव तालुका : एकूण लांबी : ४२.३२ किमी. धूप : ४.६६-८.०४ किमी (११ ते १९%); वाळू भर : ३.८१-५.०८ किमी (९ ते १२%)
सासष्टी तालुका : एकूण लांबी : २१.१४ किमी. धूप : ३.८१-८.०३ किमी (१८ ते ३८%); वाळू भर : २.३३-४.०२ किमी (११ ते १९%)
केपे तालुका : एकूण लांबी: ४.०६ किमी. धूप : ०.२०-०.३२ किमी (५ ते ८%); वाळू भर : ०.०८-०.१६ किमी (२ ते ४%)
काणकोण तालुका : एकूण लांबी : ६६.१७ किमी. धूप : ३.९७-६.६२ किमी (६ ते १०%); वाळू भर : १.९९-७.२८ किमी (३ ते ११%)
एकूण ५८.४९ कि.मी. किनारपट्टीची धूप
उत्तर गोव्याला मोठा परिणाम; ३० टक्क्यांपर्यंत स्थिर क्षेत्र कमी
पर्यावरणीय बदल हे प्रमुख कारण.
किनाऱ्यांवरील जीवनशैली, रोजगार व संस्कृतीवर मोठा परिणाम
पेडणे, सासष्टी आणि मुरगाव हे तालुके सर्वाधिक प्रभावित
तिसवाडी व बार्देश येथे वाळूची भर वाढल्याने थोडा दिलासा.
काणकोण तालुक्याची किनारपट्टी लांबी सर्वाधिक असली तरी धूप तुलनेत कमी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.