

पणजी: जिल्हा पंचायतीसाठी मतदान करण्यासाठी गेलेल्या अनेक मतदारांनी शनिवारी मतपत्रिकेवरील अनुक्रमांक आणि मतदान यादीतील सीरियल क्रमांक एकच असूनही अधिकाऱ्यांनी तो नोंद करून घेतल्याने तसेच मतपत्रिकेत ‘नोटा’ पर्याय नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तशा तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या आहेत.
परंतु, जिल्हा पंचायत निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया ही पंचायतराज कायद्यातील नियमांनुसारच झाल्याचे स्पष्टीकरण आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिले. जिल्हा पंचायतीच्या पन्नास मतदारसंघांसाठी शनिवारी मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया पार पाडली. परंतु, मतदारांना मतपत्रिका देत असताना त्यांच्या मतपत्रिकेतील अनुक्रमांक आणि मतदार यादीतील क्रमांक सारखाच असल्याचे अनेकांना दिसून आले.
मतपत्रिका देत असताना हे क्रमांक तेथील अधिकारी नोंदवून घेत होते. या प्रकारामुळे मतदानाची गोपनीयता राहूच शकत नाही, असा मुद्दा काही मतदारांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुठ्ठाळी मतदारसंघातील रूपेश शिंक्रे यांनी मतदान करण्यास नकार देत आणि कायद्याच्या १९ (१)(अ) या कलमाचे उल्लंघन झाल्याचा दावा करीत मतपत्रिका संबंधित अधिकाऱ्यांकडे परत केली.
शिवाय मतपत्रिकेत ‘नोटा’चा पर्याय नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुर्ल-साखळी येथील एका मतदारानेही ‘नोटा’चा पर्याय नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला मतदान करायचे आहे. पण, मनासारखा उमेदवार नसल्याने ‘नोटा’चा पर्याय स्वीकारायचा आहे. परंतु, मतपत्रिकेत तोच पर्याय नसल्याने आम्ही मतदानाचा अधिकार बजावणार कसा, असा प्रश्न केला.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीचे मतदान गेल्या अनेक वर्षांपासून मतपत्रिकेद्वारे घेण्यात येत आहे. पंचायतराज कायद्यातील नियमांनुसारच ही निवडणूक घेण्यात येते. मतदानासाठी येणाऱ्या मतदाराला मतपत्रिका दिल्यानंतर त्याला ती मिळाली, हे दर्शवण्यासाठी स्लीपवर अनुक्रमांकाची नोंद करावी लागते, असे राज्य निवडणूक आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.