

पणजी: राज्यात वाढलेल्या उष्म्याचा दुहेरी परिणाम पाहायला मिळत असून एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे बाजारात भाजीपाला आणि फळांच्या दरात वाढ झाली आहे. काकडी, टोमॅटो आणि लिंबू यांसारख्या उष्णतेत दिलासा देणाऱ्या वस्तूंना मोठी मागणी वाढल्याने त्यांचे दर चढले आहेत. पणजी बाजारात मध्यम आकाराचे एक लिंबू सुमारे ७ रुपयांना विकले जात आहे.
इतर भाज्यांच्या दरातही वाढ झाली असून भेंडीचा दर ७० वरून ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे, तर कांदा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. कलिंगड, मोसंबी यांसारख्या फळांच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र, गोवा फलोत्पादन महामंडळावर तुलनेने स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध असल्याचे दिसून येते.
दरम्यान, तापमानात किंचित घट नोंदवली गेली असली तरी उष्म्याची तीव्रता मात्र वाढतच आहे. एप्रिलच्या सुरवातीला ३५.२ अंशांवर पोहोचलेले कमाल तापमान सध्या ३३.८ अंशांवर आले असले तरी ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळेत नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
गोवा वेधशाळेने नागरिकांना उष्म्यापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले असून, रविवारी काही भागांत दुपारनंतर किंवा सायंकाळी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तापमान नोंद
(अंश सेल्सिअस):
१ एप्रिल - ३५.२
२ एप्रिल - ३४.७
३ एप्रिल - ३४.२
४ एप्रिल - ३३.८
हंगामी फळांना मोठी मागणी
हंगामी फळांना मोठी मागणी वाढली असून फणस, कैऱ्या, रानमेवा यांसोबत शहाळे ६० ते ८० रुपयांना विकले जात आहेत. बाजारात मानकुराद, हापूस, मांगेलाल, तोतापुरी आदी आंब्यांची आवक सुरू झाली असून ४०० ते १५०० रुपये प्रतिडझन दर आहे. आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.