
Goa Winter Updates
पणजी: गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. दरम्यान, ग्रामीण भागात रात्री आणि सकाळच्या वेळी थंडीमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे गोवा हवामान खात्याने म्हटले आहे.
राज्यात पहाटे धुके व दवही मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. सोमवारपासून राज्यातील किमान तापमान २० अंशांखाली गेले आहे. मंगळवारी १८.६ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली, जे यंदाचे सर्वांत किमान तापमान आहेच, त्यासोबत मागील ५० वर्षांच्या डिसेंबरमधील सर्वांत किमान तापमानांपैकी एक आहे. यंदा राज्यात जसे पावसाने सारे विक्रम मोडत नवे विक्रम प्रस्थापित केले, तसेच थंडीही नवे विक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.
राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार थंडी पडत असल्याने लोक स्वेटर व इतर उबदार कपडे परिधान करू लागले आहेत. या कपड्यांची मागणी वाढली आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अधिकच जाणवत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या आहेत. खासकरून सत्तरी, काणकोण, सांगे, धारबांदोडा, पेडणे आदी भागात मोठ्या प्रमाणात थंडीचा प्रभाव जाणवत आहे.
सातत्याने होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम काजू उत्पादकांसमोर मोठे संकट बनले आहे. मागील दोन वर्षांत काजू उत्पादकांना योग्य प्रमाणात उत्पादन लाभले नाही, परंतु यंदा झालेला मुबलक पाऊस आणि थंडीचा कडाका वाढलेला असला तरी ही थंडी काजू आणि आंब्याच्या मोहोरासाठी पोषक ठरेल, असे मत कृषी अभ्यासक संदीप फळदेसाई यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी सततच्या हवामान बदलामुळे अपवाद वगळता काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकात घट झाली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भावही मिळाला नाही. गेल्या वर्षी फेणी, हुर्राक काढणाऱ्यांना बोंडू मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काजू शेतकऱ्यांकडून बोंडू आणून फेणी, हुर्राक काढण्याची वेळ व्यावसायिकांवर आली होती; परंतु यंदा जर चांगली थंडी पडली आणि मोहोर चांगला आल्यास निश्चितपणे नुकसान भरून काढण्यात मदत होईल, असे मत फळदेसाई यांनी व्यक्त केले.
कृषी संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यातील ५,०९० हेक्टर क्षेत्रफळात आंबा लागवडीखाली होता, तर एकूण १००७९ टन उत्पादन गेल्या वर्षी घेण्यात आले. राज्यात ५७,००१ हेक्टर क्षेत्रफळात काजू लागवड केली आहे. मागील आर्थिक वर्षात राज्यात २४,२४० टन इतके काजू उत्पादन घेण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.