

मडगाव: एप्रिल महिना अर्ध्यावर आला असताना राज्यातील बहुतेक जलाशयांतील पाणीसाठा पन्नास टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली जलाशयात सध्या ४८ टक्के पाणी शिल्लक आहे. सोमवारी या जलाशयातील पाण्याची पातळी ३४.०५ मीटर इतकी नोंदविण्यात आली.
पाणी खात्याकडून उपलब्ध माहितीनुसार, सध्या साळावली जलाशयात ४८ टक्के, अंजुणे जलाशयात ३१ टक्के, आमठाणे जलाशयात ४२ टक्के, तिळारी जलाशयात ४६ टक्के, पंचवाडी जलाशयात ४२ टक्के, तर चापोली व गावणे या जलाशयांत ५४ टक्के पाणी उपलब्ध आहे. अद्याप सुमारे ४५ दिवसांचा उन्हाळा बाकी असल्याने हा साठा मे महिन्यापर्यंत पुरेसा ठरेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. साळावली जलाशय हा दक्षिण गोव्याचा मुख्य पाणीस्रोत असून, येथून सांगे, केपे, सासष्टी व मुरगाव या चार तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा सुरू होण्यास उशीर झाल्यास या भागांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार आहे, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यात पाऊस लांबल्यास पाणी टंचाई भासू शकते.
सध्या सर्वाधिक गंभीर स्थिती सत्तरी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजुणे जलाशयाची असून, तेथे केवळ ३१ टक्के पाणी शिल्लक आहे. बार्देश व पेडणे तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या तिळारी जलाशयात ४६ टक्के, तर बार्देश तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आमठाणे जलाशयात ४२ टक्के पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासल्यास राज्यातील विविध नद्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. गोव्यात सध्या ३०० हून अधिक ठिकाणी असे बंधारे बांधलेले असल्याची माहिती पाणी खात्याकडून देण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.