सासष्टी, लोकशाहीचे रक्षण सुबुद्ध नागरिकांच्या हातात आहे. जर जागृत नागरिक देशात नसतील, तर आम्हाला लोकशाही विसरावी लागेल व हुकुमशाहीला सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन मानवी हक्क व शांततेचे क्रियाशील कार्यकर्ते फादर सेड्रिक प्रकाश एस. जे. यांनी केले.
मडगावात होली स्पिरीट चर्च सभागृहात शनिवारी संध्याकाळी ‘अलायन्स फॉर जस्टीस ॲण्ड हार्मोनी’ संस्थेने आयोजित केलेल्या ‘निवडणुकीनंतर भारतातील संभाव्य प्रतिसादांची आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
या निवडणुकीत देशातील कमीत कमी १४० मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये लबाडी केल्याचे पुरावे सापडले आहेत. मतमोजणीतही कित्येक चुका झालेल्या आहेत. टपाल मतपत्रिका सुरवातीला मोजायला हव्या होत्या, पण तसे न करता त्यानंतर मोजण्यात आल्या, असेही फादर प्रकाश यांनी निदर्शनास आणून दिले.
सामान्य नागरिकांच्या संघटनांनी याची चौकशी करण्याची मागणी केली हे एका दृष्टीने चांगले झाले. ज्या मतदारसंघांमध्ये फेरबदल करण्याचा प्रकार झाला, त्याची निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रातील भाजप सरकारला जेडीयू व टीडीपीसारख्या नैतिक व कायदेशीर विवादात गुरफटलेल्या पक्षांवर अवलंबून रहावे लागत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आर्थिक व राजकीयदृष्ट्या फायद्यात असल्याने ते विरोधी पक्षांना चकीत करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे. हेसुद्धा देशाच्या हिताचे नाही, असेही फादर प्रकाश यांनी सांगितले.
निवडणुकीत शिस्तीचा अभाव
आपल्या देशात लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या संस्थांना संरक्षण देणे गरजेचे आहे. सध्या देशातील निवडणुका योग्य पद्धतीने, शिस्तीने व प्रामाणिकपणे होत नाहीत हे तेवढेच खरे आहे, असे फादर प्रकाश म्हणाले.
सध्याचे सरकार प्रतिशोधात्मक
सध्याचे केंद्र सरकार प्रतिशोधात्मक व संतापजनक असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीही सुबुद्ध व जागृत नागरिकांमुळे अजुनही देशात लोकशाही जिवंत आहे, असे फादर प्रकाश यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.