
Navy training center Goa:गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी, माजी नौदल अधिकारी डॉ. श्रीकांत केसनूर यांच्या मते, गोवा भारताच्या सामरिक सागरी क्षमतेचं प्रमुख केंद्रही आहे. पाणबुडी बनवणे असो वा फायटर पायलट किंवा भविष्यातील अॅडमिरल तयार करणे असो, भारताची सागरी ओळख गोव्यात तयार होते असे केसनूर यांचे म्हणणे होते. क्लब टेनिस दे गॅस्पार डायसच्या शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने, डॉ. केसनूर यांनी ‘नेव्ही अँड द नेशन: नेव्हीज रोल इन नेशन बिल्डींग’ या विषयावर मिरामार येथील क्लबच्या सभागृहात सादरीकरण करताना गोव्याचे सामरिक महत्त्वही विशद केले.
भारतीय नौदलात ३६ वर्षे सेवा बजावलेल्या डॉ. केसनूर यांनी नौदल इतिहासकार आणि पूर्व आफ्रिकेसाठी संरक्षण सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. उपस्थितांना भारताच्या सागरी वारशाची आणि नौदलाच्या राष्ट्रनिर्माणातील भूमिकेची अनुभवपूर्ण माहिती देताना डॉ. केसनूर यांनी गोव्यातील नौदल पायाभूत सुविधांचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘गोवा हा भारतीय नौदलाच्या विमानदलाचा केंद्रबिंदू आहे. येथे फायटर, हेलिकॉप्टर आणि टोही पथकांसाठी पायलट तयार केले जातात. गोवा अभिमानाने म्हणू शकतो की भारतातील सर्वोत्तम नौदल पायलट इथे तयार होतात.’
भारताची हायड्रोग्राफी प्रशिक्षण शाळा, जी जागतिक दर्जाचे सागरी सर्वेक्षक तयार करते, ती गोव्यात आहे, भविष्यातले अॅडमिरल घडवणारे प्रतिष्ठित नेव्हल वॉर कॉलेजही गोव्यात आहे. गोवा केवळ प्रशिक्षण केंद्र नसून एलिट कमांडो ट्रेनिंग स्कूल, ओशन सेलिंग नोड आणि भारतातील सर्वोत्कृष्ट नौदल संग्रहालयही येथेच आहेत असे डॉ. केसनूर यांनी नमूद केले.
इतिहासाकडे वळत, डॉ. केसनूर यांनी १९६१ साली झालेल्या गोव्याच्या मुक्ततेचा उल्लेख केला आणि अंजदिव बेट, मुरगाव बंदर आणि दीव येथे नौदलाने हाती घेतलेल्या मोहिमांची माहिती दिली.
अंजदिव बेटावर भारतीय नौदलाची जमिनीवर लढाई झाली, हे एकमेव दस्तऐवजीकरण केलेलं उदाहरण आहे, ज्यातून नौदलाची समुद्राबाहेरही कारवाई करण्याची क्षमता दिसते. गोपनीय माहिती न उघड करता, डॉ. केसनूर यांनी सांगितलं की ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तैनात केलेली भारतीय नौदलाची जहाजं शत्रूला “खूपच घाबरवणारी” होती.
या स्वदेशी जहाजांनी भारताने स्वातंत्र्यानंतर किती मोठी प्रगती केली आहे, हे सिद्ध केले आहे. त्या आधी भारताकडे केवळ काही ब्रिटीश जहाजं होती, असे ते म्हणाले. पाकिस्तानकडून कायम धोका आहे हे सांगताना भारत “समुद्राबाबत डोळस” असला पाहिजे असे सांगून ते स्पष्टपणे म्हणाले की केवळ मुत्सद्देगिरीवर भारत अवलंबून राहू शकत नाही.
"पश्चिमी लोकशाही राष्ट्रं जी पावले उचलायला घाबरली, ती आपण अरबी समुद्रात उचलली. भारतीय नौदलाने तेव्हा जबाबदारीने पुढाकार घेतला," असं त्यांनी पायरसी आणि राज्यस्तरीय धोके यावर भाष्य करताना सांगितलं. ‘गोव्यात तयार झालेली जहाजे, उदाहरणार्थ, सेल ट्रेनिंग शिप आयएनएस तरंगिणी आणि रत्नाकर दांडेकर यांची शिपबिल्डिंग परंपरा भारताच्या संरक्षणातील गोव्याचं औद्योगिक महत्त्व दर्शवते.
गोव्याने त्याचा अभिमान बाळगायला हवा. पर्यटन स्थळाबरोबरच गोवा हे भारताच्या सामरिक सागरी सामर्थ्याचं केंद्र आहे.’ असे सांगून शेवटी डॉ. केसनूर म्हणाले की, गोवा नौदल इतिहासात फक्त निरीक्षक नव्हता, तर गोव्याची त्यात सक्रिय आणि महत्त्वाची भागीदारी होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.