
पणजी : राज्य पर्यटन खात्याने समुद्रकिनाऱ्यांवरील दलाल आणि अवैध धंद्यांच्या उपद्रवाविरुद्ध कठोर कारवाईची पावले उचलली आहेत. पर्यटकांना किनाऱ्यावर चांगला अनुभव यावा, त्याचबरोबर त्यांना सुरक्षित वाटावे यासाठी ही पावले उचलण्यात आली असून, त्यामुळे अधिकृत व्यवसायच किनाऱ्यावर दिसतील, असे पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले.
पर्यटन खात्याच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाईक म्हणाले, दलाल आणि अनधिकृत विक्रेत्यांना समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी काम करण्यापासून रोखण्यासाठी खात्याने शॅकचालक, बीच असोसिएशन आणि इतर भागधारकांना निर्देश जारी केला आहे.
बीच असोसिएशनने उपस्थित केलेल्या चिंतेला प्रतिसाद म्हणून, त्यांना सक्रिय उपाययोजना करण्यास सांगितले आहे. ते समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्यास, पर्यटन खाते स्वतः या अनधिकृत क्रियाकलापांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कायदेशीर यंत्रणेसह पाऊल उचलणार, असे सांगण्यास आले आहे.
शिवाय, बीच शॅकचालकांना त्यांच्या परिसरात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन खाते अशा समस्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी, बीच असोसिएशनना सक्षम करण्याच्या दृष्टीने कठोर नियम लागू करण्यास पावले उचलत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पर्यटन खाते राज्यात पर्यटकांसाठी त्रासमुक्त असे वातावरण तयार करण्यासाठी काम करत आहे. एक प्रीमियम पर्यटन स्थळ म्हणून राज्याचा नावलौकिक राखण्यासाठी, समुद्रकिनाऱ्यांवरील दलाल आणि बेकायदेशीर व्यवसायांच्या समस्येला आळा घालण्यचे हे पाऊल आहे.
अभ्यागतांना कोणत्याही त्रासाशिवाय आमच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता यावा, हा आमचा उद्देश आहे. पर्यटक आणि भागधारकांना ‘बीच व्हिजिल ॲप''वर दलाल-संबंधित तक्रारी नोंदवण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.