
पणजी: आदिवासी कल्याण खात्याची गरजच काय? तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ते सरकारी कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचे भाष्य करणे कला संस्कृती आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांना चांगलेच भोवणार असं दिसतंय. गावडेंच्या बेताल वक्तव्याची गंभीर दखल भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी घेतली असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली आहे.
"भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. प्रत्येकवेळी उचलली जीभ लावली टाळ्याला असे होणार नाही. हा असला बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. हा फक्त इशारा नाही तर त्याप्रमाणे योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली जाईल," असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष दामू नाईक केले आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी देखील यावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातील मंत्री गोविंद गावडेंचा आरोप दुर्दैवी असल्याचे तानावडे यांनी म्हटले आहे.
"एका मंत्र्याने असे विधान करणे चुकीचे आहे. ह्या सगळ्याची योग्य ती दखल केंद्र पातळीवर घेतली जाणार आहे. उगाच हवेत बाण मारण्याऐवजी काही वस्तुस्थिती असेल तर ती त्यांनी मांडली पाहिजे," असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.
गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याची गरजच काय? असे वक्तव्य केले होते यावर सभापती रमेश तवडकरांनी देखील त्यांचा खरपूस समाचार घेतला. केवळ वाद निर्माण व्हावा आणि श्रेयवादासाठी हे विधान केल्याची आरोप तवडकरांनी केला आहे.
'एखाद्या मंत्र्याने मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यात भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप करणे किती योग्य आहे, याचा विचार व्हायला हवा. आरोप करणारे मंत्री हे सरकारमधील एक घटक आहेत आणि ज्या खात्यावर हा आरोप केला गेला, त्याचे प्रमुख खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या प्रकरणी स्वतः मुख्यमंत्रीच योग्य उत्तर देतील. मी सभापती असल्याने या संदर्भात बोलणे योग्य नाही', असे रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.
मंत्री गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचार होत असल्याबाबत केलेले वक्तव्य कालपासून चर्चेचा विषय बनला आहे. पणजीत आज एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आलेल्या रमेश तवडकर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'मी त्या संदर्भात प्रतिक्रिया देणे योग्य ठरत नाही. कारण, ज्या मंत्री महोदयांनी आदिवासी खात्यासंदर्भात वक्तव्य केले आहे, ते खाते स्वतः प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या आरोपावर मुख्यमंत्रीच योग्य प्रतिक्रिया देतील.
एवढे मात्र खरे की, आदिवासींसाठी सरकारकडून अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जात आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे, असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडाव्यात. त्याचे निश्चितपणे निराकरण केले जाईल. कारण, हे सरकार सर्वांच्या कल्याणसाठीच काम करीत आहे'.
बिरसा मुंडांची ओळख जगभर
'भगवान बिरसा मुंडांची ओळख संपूर्ण जगाला व्हावी, यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव मान्य केला होता. त्यामुळे संपूर्ण देशभर ज्या राज्यात आदिवासी समाज अधिक संख्येने आहे, त्या राज्यात हा कार्यक्रम साजरा केला जात आहे. जवळपास १० हजार लोक रॅलीतही सहभागी झाले होते. परंतु, काही जणांना हे खुपत आहे, याचे मला आश्चर्य वाटते. प्रत्येकाला उत्तर देण्यात मला रस वाटत नाही; कारण मी 'श्रमधाम' सारख्या सामाजिक कार्यात गुंतलेलो आहे, असेही तवडकर म्हणाले
काय कारवाई होणार?
गोविंद गावडे आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कला अकादमीच्या मुद्यावरुन अगोदरच अडचणीत सापडलेले गावडे आता बेताल वक्तव्यांमुळे आपल्याच सरकारच्या हिटलिस्टवर आले आहेत. गावडे यांच्यावर कारवाईचा इशारा प्रदेशाध्यक्षांनी दिल्यामुळे त्यांचे मंत्रिपद देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.