Goa School Board: दहावी विद्यार्थ्यांच्या निकालासाठी गोवा शालान्‍त मंडळाची योजना 

Goa School Board
Goa School Board
Published on
Updated on

पणजी: सरकारने(Goa Government) यंदा दहावीची परीक्षा(10th Exam) रद्द केल्याने गोवा शालान्‍त मंडळाने(Goa School Board) विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी योजना तयार केली आहे. या योजनेनुसार प्रत्येक हायस्कूलला निकाल समिती नियुक्त करून विद्यार्थ्यांना गुण द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांच्या हायस्कूलने घेतलेल्या परीक्षा व चाचण्यांमध्ये मिळालेल्या गुणांचे मुल्यांकन ही समिती करून गुण देणार आहे, ते मंडळाच्या निकषाशी जुळणे आवश्‍यक आहे.(Goa School Board plan for the results of 10th standard students) 

गोवा शालान्‍त मंडळाच्या धोरणानुसार पूर्वी हायस्कूलने दिलेले अंतर्गत 20 गुण, तर व मंडळाने घेतलेल्या परीक्षेत 80 गुण असे मिळून 100 गुण दिले जात होते. सध्या सगळ्या हायस्कूलने मंडळाच्या पोर्टलवर अंतर्गत 20 गुण अपलोड केले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने 80 गुणांचे मुल्यांकन आता हायस्कूलना करायचे आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षा व चाचण्यांमधील गुणावर हे गुण देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना गुण देताना मंडळ त्या हायस्कूलच्या कामगिरीचाही विचार करणार आहे. 

विद्यार्थ्यांना 80 गुणांचे मुल्यांकन करण्यासाठी मंडळाने मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. त्यानुसार प्रत्येक हायस्कूलने निकाल समिती स्थापन करायला हवी. या समितीवर मुख्याध्यापक व 8 शिक्षक असणे आवश्‍यक आहेत. त्यामध्ये दोन शिक्षक शेजारील हायस्कूलचे असणे सक्तीचे आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या आधारावर हे गुण दिले गेले आहेत. त्या दस्तावेजांचा पुरावा सांभाळून ठेवणे आवश्‍यक आहे. गुणांच्या पडताळणीसाठी हा पुरावा महत्त्वाचा ठरणार आहे. 80 गुणांचे मुल्यांकन करताना नववीमध्ये मिळालेल्या गुणांचाही आधार घेतला जाणार आहे. त्यात दहावीच्या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या पहिल्या सहामाहीसाठी 20 गुण, दुसऱ्या सहामाहीसाठी 20 गुण, चाचण्यांसाठी 10 गुण, पूर्वपरीक्षेसाठी 10 गुण व नववीच्या 20 गुण, असे मिळून हे 80 गुण गृहित धरले जाणार आहेत. 

परीक्षा झाली नाही, तर वा परीक्षेला एखादा विद्यार्थी बसला नाही तर त्याचा दस्तावेज पुरावा म्हणून ठेवण्यात यावा. निकाल समितीने गुण निश्‍चित केल्यानंतर विद्यार्थ्याचे गुण मंडळाने ठरविलेल्या निकषानुसार आहेत की नाही ते पाहावे लागणार आहे. जर हे गुण जुळत नसल्यास ते परत निकाल समितीकडे पुनर्मुल्यांकनासाठी पाठवण्यात येतील व तरी ते जुळत नसल्यास विद्यार्थ्याच्या वर्षाच्या कामगिरीवर आधारीत गुण देण्यात येणार आहेत. 

जर एखाद्या विद्यार्थ्याने कोणतीच परीक्षा दिलेली नसल्यास त्याच्यासाठी वेगळे निकष मंडळाने लागू केले आहेत. हायस्कूलला त्या विद्यार्थ्याबरोबर ‘वन टू वन ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ तसेच दूरध्वनीवरून त्याचे मुल्यांकन करावे लागेल व त्याचा पुरावा ठेवावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगळे निकष ठेवण्यात आले आहेत. एकदा मंडळाचा अंतिम निकाल जाहीर झाला की, त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. मंडळाने ठरवून दिलेल्या धोरण व निकषानुसार गुण दिलेले नसल्यास त्या हायस्कूलचा निकाल जाहीर केला जाणार नाही. 

निकाल जाहीर झाल्यानंतर पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. जे परीक्षेला बसले नाहीत किंवा अंतर्गत मुल्यांकनामध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांना ही परीक्षा असेल. ‘एटीकेटी’ मिळालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्या दरम्यान त्यांना पुरवणी परीक्षा देता येईल. यंदा गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी देण्याची तजवीज नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com