
मडगाव: एकेकाळी साळ नदीला सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखत होते. कित्येक स्थानिक मच्छीमार या नदीतील माशांवर आपला उदरनिर्वाह चालवायचे. मात्र, आज ही नदी राज्यातील सर्वात प्रदूषित अशी नदी बनली असून मानवी मैला आणि अन्य सांडपाणी थेट या नदीत सोडल्याने या नदीचे आरोग्य बिघडले आहे.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत या नदीतील बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) प्रती लिटर ४.२ ते १६.८ मिलीग्रॅम एव्हढे आहे. त्यामुळे या नदीला प्रायोरिटी ३ या श्रेणीत वर्ग करण्यात आले आहे. बीओडीचे प्रमाण प्रति लिटर ५ पेक्षा कमी असलेली नदी सुरक्षित मानली जाते. पण साळ नदीतील पाणी त्यापेक्षा तिप्पट प्रदूषित आहे.
या प्रदूषणामुळे या नदीच्या खाडीत पूर्वी ज्या तिसऱ्या (शिंपले) सापडायच्या त्याचे प्रमाण कमी झाले असून कित्येक स्थानिक मच्छीमारांना रोजगारापासून वंचित रहावे लागले आहे. या नदीच्या प्रदूषणाचा अभ्यास केलेले डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांनी या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करताना या नदीत मिळणारे मासे आता लोकांना खाण्यासाठी सुरक्षित आहेत का याचा अभ्यास करण्याची गरजअसल्याचे सांगितले.
वाळवंटी नदी प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात असून दिवसेंदिवस या नदीत मानवनिर्मित प्रदूषणाचे आक्रमण वाढत असल्याचे आढळून येत आहे. कचऱ्यासह या नदीत सांडपाणी मिसळत असतानाच विविध ठिकाणी कपडे आणि गुरांना धुण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या नदीत काही ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे. ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही वर्षांनंतर नदीचे अस्तित्व पूर्ण धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
सर्वेक्षणाअंती डिचोलीतून वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचा अहवालही संबंधित अधिकारीणीने तयार केला असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील तळेखोल येथून उगम झालेली डिचोली नदी वाळवंटी नदीचा फाटा आहे. डिचोलीहून पुढे कारापूरहून ही नदी मांडवी नदीला जाऊन मिळते. या नदीवर कुडचिरे ते डिचोलीपर्यंत आठ बंधारे आहेत. २५ वर्षांपूर्वी किरकोळ अपवाद वगळता ही नदी स्वच्छ दिसून येत होती. मात्र, हळूहळू ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेली.
राज्यातील नद्यांची स्थिती दयनीय झाली असून कुठे नद्यांचे पात्र रुंद होत आहे, तर कुठे उथळ बनत चालले आहे. फोंडा भागातील खांडेपार नदी तर पावसाळयात दुथडी भरून वाहते, तर उन्हाळ्यात उथळ बनते. नदीच्या पात्रात जिलेटिनचे स्फोट आणि वारेमाप रेती उत्खनन यामुळे नदीचे पात्र कुठे उथळ तर कुठे खोल बनत चालले आहे.
दहा - पंधरा वर्षांपूर्वी या नदीचे पात्र कधी उथळ बनलेले कुणी पाहिले नाही मात्र अर्धे अधिक पात्र उन्हाळ्यात सुकत चालल्यामुळे नदीचे अस्तित्वच संकटात येण्यासारखी स्थिती आहे.
म्हादईचे पाणी पळवण्याचा घाट कर्नाटकने रचल्यानंतर ही स्थिती उद्भवली असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. घाट माथ्यावरील म्हादईचे पाणी वळवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने चालवल्यामुळे भविष्यात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आणि भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वास्तविक दूधसागर आणि खांडेपार नदीचे पाणी दोन तालुक्यांना पुरवले जात असून हा पाणी साठा मुबलक रहावा यासाठी सरकारच्या जलस्त्रोत खात्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, म्हादईचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत भविष्यात पाणीबाणीची भीती कायम राहणार आहे कारण म्हादईचे पाणी दूधसागर नदीच्या फाट्याला मिळत असल्याने कर्नाटकी प्रयत्नांमुळे त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे.
एक काळ होता ज्यावेळेला खांडेपार नदीत मुबलक खुबे शिंपले मिळायचे, पण आता ही मत्स्यसंपदा कमी झाल्यामळे एक काळ रोजगाराचे साधन असलेली ही मत्स्यसंपदा बऱ्याच अंशी कमी झाली आहे.
याशिवाय खांडेपार आणि म्हादई नदीच्या कडा महापुरामुळे कोसळत चालल्यामुळे पात्रे रूंद होत चालली आहेत. नदीच्या कडेला असलेली झाडपेडे पात्रात कोसळत असल्याने पात्रे रूंद होत चालली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.