
पणजी: राज्याचे सार्वजनिक बांधकाम, बंदर कप्तान आणि वजनमाप खात्याचे नवे मंत्री दिगंबर कामत यांनी बुधवारी (०३ सप्टेंबर) मंत्रिपदाचा पदाभार स्वीकारला. पर्वरीतील कार्यालयात त्यांनी हजेरी लावत पदभार स्वीकारला. १३ वर्षानंतर कामत यांनी मंत्री म्हणून कमबॅक केले आहे. पदभार स्वीकारताच कामत यांनी राज्यातील रस्त्यांबाबत मोठी घोषणा केली आहे.
दिगंबर कामत आणि रमेश तवडकरांनी २१ ऑगस्ट रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. तवडकरांना कला, संस्कृती, क्रीडा यासह आदिवासी कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, कामतांकडे सार्वजनिक बांधकाम, बंदर कप्तान आणि वजनमाप खात्याची जबाबदारी सोपवली आहे. दिगंबर कामतांनी बुधवारी पर्वरी येथील कार्यालयाद पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी मंत्रिपदाच्या संधीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले तसेच, खात्याला योग्य न्याय देण्याचे भाष्य केले.
राज्यातील रस्त्याची झालेली दुरावस्था याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता कामत यांनी रस्ते व्यवस्थित करण्याचा निर्धार बोलून दाखवला. “राज्यातील खराब रस्त्यांवर प्राधान्याने काम केले जाईल, अभियंत्यांना खराब रस्ते शोधून त्यावर काम सुरु करण्याचे आदेश दिले जातील. मला एक ते दोन महिन्यांचा कालावधी द्या आणि तुम्हाला फरक लक्षात येईल. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग मिळतो, असे माझे तत्व आहे,” असे मंत्री दिगंबर कामत म्हणाले.
राज्यातील खराब रस्त्यांचा मुद्दा विधानसभेत देखील उपस्थित करण्यात आला होता. तसेच, यामुळे वाढते अपघात देखील चिंतेची बाब असल्याचे आमदारांनी नमूद केले होते. दोन वर्षापूर्वी नीलेश काब्राल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी होती. काब्राल यांच्या राजीनाम्यानंतर बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवले होते. दरम्यान, अलिकडे झालेल्या फेरबदलात मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी अनुभवी दिगंबर कामत यांच्याकडे सोपवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.