Agriculture
AgricultureDainik Gomantak

Agriculture: जलस्त्रोत खात्याने उभारलेल्या बंधाऱ्यांमुळे बागायतींचे नुकसान, गुळेलीत शेतकरी त्रस्त

जलस्त्रोत खात्यातर्फे उभारलेले हे बंधारे नदीकाठच्या शेती, बागायतीसाठी काळ ठरू लागले आहेत
Published on

Agriculture म्हादई व रगाडा नदीवर उभारण्यात आलेले बंधारे सध्या शेती, बागायतीच्याच मुळावर उठू लागले आहेत. जलस्त्रोत खात्यातर्फे उभारलेले हे बंधारे साधारणपणे नोव्हेंबर,डिसेंबर दरम्यान पूर्ण क्षमतेने भरलेले असतात आणि यामुळे नदी काठोकाठ भरून राहते.

परिणामी नदीकाठची बागायतीची जमीन भुसभूशीत बनते व नदीचा प्रवाह वाढू लागला की, ती जमीन प्रवाहाबरोबर ढासळते. यामुळे सुमारे मीटरभर पाण्यात बागायती लुप्त होतात. हा प्रकार दरवर्षी होत असल्याने गुळेलीत नदीकाठचे बागायतदार सध्या हवालदिल झाले आहेत.

म्हादई नदी व रगाडा नदीवर वेगवेगळ्या ठिकाणी काही वर्षांपासून वसंत बंधारे उभारण्यात आले आहेत, याचा फायदाही तसा उन्हाळ्यात पाणी टंचाईवर होताना दिसत आहे.

या बंधाऱ्यामुळे या भागातील जानेवारी -फेब्रुवारीत तळ गाठणाऱ्या विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ लागले. तसेच बागायतीही फुलू लागल्या. परंतु हेच वसंत बंधारे नदीकाठच्या शेती, बागायतीसाठी काळ ठरू लागले आहेत.

या संबंधी जलस्त्रोत खात्यातर्फे एक योजना आखून अशा बागायतींचा अभ्यास करून तिथे संरक्षक भिंत उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे, आणि याचा लाभ बागायतदारांना होताना दिसत आहे.

Agriculture
Bicholim Municipality: खाणींना सहकार्य कराच, पण आमचाही विचार करा- सेझाच्या कामगारांची मागणी

काही मोजक्याच ठिकाणी जलस्त्रोत खात्यातर्फे अशा प्रकारच्या संरक्षण भिंती उभारलेल्या आहेत. पण इतर ठिकाणी ज्यांना अजून संरक्षक भिंती उभारून दिलेल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांचे‌ काय , असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

निदान यावर्षी तरी संबंधित खात्याने सरंक्षक भिंत उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा.

बागायतदारांचे हित जपण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री रवी नाईक, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पुढाकार घ्यावा, अशी‌ मागणी गुळेली येथील शेतकरी करू लागले आहेत.

रगाडा नदीकाठी आपली बागायत आहे आणि दरवर्षी पावसाळ्यात मीटर भर जमीन पाण्याबरोबर वाहून जात आहे. आपण घेतलेले पीक सुद्धा नदीच्या पात्रात जात आहे. याचा विचार करून जलस्रोत खात्याला आपण यासंदर्भात काही वर्षांपूर्वी एक निवेदन दिले होते, त्यावर त्यांनी संरक्षक भिंत उभारण्याचे आश्वासन दिले होते.

पण दरवर्षी आपण संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधी विचारतो, तेव्हा तुमची फाईल डिचोली कार्यालयात गेली, बांधकामाचा खर्च वाढला म्हणून परत आली, अशी उत्तरे मिळतात. दरवर्षी डोळ्यांदेखत वाहून जाणारी बागायत बघावी लागते. - यशवंत सावंत, शेतकरी-गुळेली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com