

डिचोली: गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मयेसह डिचोलीतील विविध भागात कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेती आडवी झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असाच पाऊस पडत राहिल्यास यंदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एका बाजूने पावसाचा धुमाकूळ तर दुसऱ्या बाजूने कापणी यंत्राची अनुपलब्धता यामुळे तयार झालेले भात पीक कापण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. परिणामी यंदा भातशेती संकटात सापडली आहे.
पावसाच्या कहरामुळे बळीराजा अस्वस्थ बनला असून, कपाळावर हात मारण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. यंदा भात पीक समाधानकारक मिळण्याची आशा निर्माण झाली असतानाच पर्जन्यराजा कोपलाय, तर दुसऱ्या बाजूने वेळेवर कापणी यंत्र उपलब्ध करून देण्यास कृषी खाते अपयशी ठरले आहे, अशी शेतकऱ्यांची कैफियत आहे.
पावसाचा कहर सुरू होण्यापूर्वीच भातशेती पिकून कापणीसाठी तयार झाली होती. मात्र कापणी यंत्र उपलब्ध करून देण्यात कृषी खात्याला अपयश आले. सदर यंत्र त्वरित उपलब्ध करून द्या, अशी मागणी मयेतील शेतकऱ्यांनी करून गेल्या मंगळवारी डिचोलीच्या विभागीय कृषी कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र अजूनही यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, अशी खंत मये येथील महादेव नाईक, नागेश नाईक आणि इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाचा तडाखा असाच कायम राहिल्यास यंदा भातपिकाची नासाडी अटळ असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
मयेसह बोर्डे, पिळगाव आदी डिचोलीतील बहुतांश भागात भातशेती पूर्णपणे पिकून शेतकरी कापणीच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून आज गुरुवारपर्यंत सलग पाच दिवस पर्जन्यवृष्टी झाली आहे. या तडाख्यात डिचोलीतील विविध भागातील भातशेतीत पाणी साचले असून, काही ठिकाणी भाताची कणसे आडवी झाली आहेत. बळीराजाने कापणीच्या कामाला हात घालण्याची तयारी केली होती. मात्र पावसाने कहर केल्याने शेतीत पाणी साचून भाताची कणसे आडवी झाल्याने कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.