Goa Politics: ‘आरजी’चे प्रेझेंटेशन जबरदस्त ! पण ‘टुगेदर फॉर म्हादई मूव्हमेंट’चं पुढे काय होणार?

Goa: म्हादई प्रश्नावरुन रविवारी आझाद मैदानावर ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांनी सरकार आणि इतर पक्षांना चांगलेच धारेवर धरले.
RG Manoj Parab|Goa Politics
RG Manoj Parab|Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: म्हादई प्रश्नावर राज्यातील लोक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. विरोधी पक्षनेत्यांनीही रणनीती आखायला सुरवात केली आहे. रविवारी आझाद मैदानावर ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांनी सरकार आणि इतर पक्षांना चांगलेच धारेवर धरले.

सरकारी आणि राजकीय पक्षांच्या स्वार्थी धोरणामुळेच आज कर्नाटक म्हादईचा गळा घोटत आहे. सरकारी दलालांनी ही नदी विकायला काढली आहे. त्याचा सर्वसामान्य जनतेला जबरदस्त फटका बसणार असून पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

त्यामुळे आजच जागे व्हायला हवे, असे आवाहन मनोज परब यांनी केले आहे. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत परब यांनी अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन सादर केले. ज्याचा धसका आता सरकारनेही घेतला असावा. आता ‘आरजी’च्या ‘टुगेदर फॉर म्हादई मूव्हमेंट’ला पुढे कशी दिशा मिळते याबाबत उत्सुकता आहे.

संघाचे शक्तिप्रदर्शन

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शनिवारी कांपालवर झालेल्या मार्गदर्शन सभेला लोटलेला जनसमुदाय हा अनेकांसाठी भुवया उंचावणारा ठरला आहे.

संघाच्या काही नेत्यांनी स्व. मनोहर पर्रीकर यांच्याशी पंगा घेतल्यानंतर त्या नेत्यांचे काही अनुयायीही त्या मार्गाने गेले होते व त्यामुळे गोव्यात संघाचे अस्तित्व संकटात येणार या भ्रमात ते होते, पण कांपालवरील गर्दीने त्या सर्व शंकांना विराम दिला आहे.

आता या मंडळींना गोव्यात भाजप सत्तेवर असल्याने ही गर्दी झाली असे म्हणता येईल, पण कोंबडी झाकली तरी सूर्य उगवण्याचा थांबत नाही हे उपस्थित संघवाल्यांनी दाखवून दिले.

RG Manoj Parab|Goa Politics
Ramesh Tawadkar On Mahadayi Dispute : 'म्हादई'वरुन कुणीही राजकारण करू नये; सभापती तवडकरांचा सर्व नेत्यांना इशारा

ही तर हिमनगाची टोके

80-90 च्या दशकात दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात प्रचंड संख्येने बेकायदा बांधकामे उभी ठाकली होती व राजकीय पाठबळ हे त्यामागील कारण असल्याचे आरोप होत होते. याच काळात तेथे तारांकित हॉटेलांनी आपले साम्राज्य उभारले.

सर्वसामान्यांना त्याची जाणीव झाली, तोपर्यंत फार उशीर झाला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती उत्तर गोव्यात व टोकावरील पेडणे तालुक्यात होताना दिसते. विशेषतः मोरजी व मांद्रे पंचायतीत झालेली बेकायदा बांधकामे तेथील पंचायत मंडळालाही थक्क करणारी आहेत.

मांद्रेत एका चित्रपट अभिनेत्याच्या नावावर असलेले चार घर क्रमांक गोव्याची वाटचाल कोणीकडे चालू आहे ते दर्शवते. एका पेडणेत असे तर अन्यत्र काय असेल असे सगळेच आता म्हणताना दिसतात.

नकटीच्या लग्नाला...

गणेशचतुर्थीच्या तोंडावर भाजपात दाखल झालेल्या त्या आठ काँग्रेस आमदारांचे काही खरे नाही. त्यांच्या या प्रवेशाला चार महिने उलटून गेले तरी अजून त्यांच्या पदरी अपेक्षीत काहीच पडलेले नाही. त्यामुळे त्यांना वैताग येणे स्वाभाविक आहे.

तो कोणीच तोंडावर दाखवत नसले, तरी त्यांचे समर्थक ते बोलून दाखवू लागले आहेत. प्रथम दसरा, दिवाळी, नाताळ वगैरे वायदे झाले. त्यापूर्वी गुजरात, हिमाचल निवडणुकीची म्हणे सबब सांगितली गेली होती.

तो सगळा जंजाळ पार पडल्यावर आता आपल्या नेत्यांना निश्चितपणे बक्षिसी मिळेल या आशेवर ही मंडळी होती व त्यासाठी म्हणे अनेकांनी कांपालवरील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सभेलाही आवर्जून उपस्थिती लावली होती,

तरीही त्यांच्या आशा पल्लवीत होण्याची शक्यता नाही. त्याचे कारण सध्याचा म्हादई तंटा. या तंट्यामुळे केंद्रीय नेते मंडळींकडे अन्य कोणताही प्रश्न नेण्याच्या मनःस्थितीत गोवा नेतृत्व नाही. आता बोला.

RG Manoj Parab|Goa Politics
Goa Construction:...यामुळे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक कंपनीची कार्यालये रस्त्यावर!

सर्कशीकडे गर्दी...

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाच्या फेरीत काहीवेळ गोंधळ दिसला. येथील दुकानदारांनी कथित जास्त शुल्क आकारणीच्या मुद्यावरून थोडावेळ फेरीतील आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे जत्रेत आलेल्यांनी आपली पावले सर्कशीकडे वळविली.

त्यामुळे सर्कसवाल्यांचाही चांगला गल्ला झाला असावा अशी चर्चा नंतर शहरात रंगली. थोड्यावेळानंतर जत्रेतील ही फेरी पूर्ववत झाल्याने देवदर्शनासह फेरीला आलेल्यांचा जीव भाड्यात पडला. कारण विकएण्ड असल्याने लोक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते.

बाबूश आणि जेनिफर अ‍ॅबसेन्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह मंत्री आणि आमदारांनी हजेरी लावली. काँग्रेसमधून आलेल्या आमदारांनी तर एक पाऊल पुढे जाऊन संघाचा गणवेश घातला. तसेच पक्षाचे ख्रिस्ती आमदार उपस्थित होते.

परंतु नेहमीप्रमाणे मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात अनुपस्थित होते. मोठ्या सोहळ्यांना उपस्थित न राहण्याची बाबूश यांची शैली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचा कार्यक्रम असूनही त्यांनी त्याला टांग दिली.

भागवत यांनी म्हटल्याप्रमाणे मर्जीने संघात या जबरदस्तीने नको. ही गोष्ट बाबूशना लागू होते, कारण सोहळ्यांना येण्याची त्यांची मर्जी नसते. मात्र, यात त्यांनी पत्नी तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सरात यासुद्धा गायब होत्या. यात काहीही नावीन्य नाही, कारण निवडून आल्यापासून त्या अलिप्त आहेत अशा तक्रारी वारंवार ताळगावचे मतदार करत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com