
Goa Politics Flashback
पणजी: या वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक घोटाळे उघडकीस आले. विशेषतः सरकारी नोकऱ्या देतो म्हणून झालेल्या फसवणुकी गाजल्या. यावरून विरोधकांना सरकारला कोडींत पकडण्याची मोठी संधी निर्माण झाली होती. मात्र, तसे काही झाले नाही. विरोधकांनी सुटे सुटे केलेले वार सरकारने लिलया पचवले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयावर अजिबात विचलित न होता प्रकरण हाताळले. त्यामुळे विरोधकांना आता काय करावे, असा प्रश्न पडला. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस एवढे मोठे घोटाळे उघड होऊनही त्याचा राजकीय लाभ विरोधकांना न मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. यानिमित्ताने हतबल विरोधक अशी नोंद २०२४ मध्ये करावी लागली आहे.
तसे पाहता २०२४ हे वर्ष राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय आणि घडामोडींनी भरलेले ठरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या हालचाली, नेत्यांचे पक्षांतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वांनी राज्यातील राजकीय वातावरण तापवले. मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन जागांसाठी दुरंगी लढती पाहायला मिळाल्या.
भाजप आणि ‘इंडिया’ आघाडी यांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले होते. सावर्डेचे माजी आमदार आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊस्कर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले कार्लुस आल्मेदाही स्वगृही परतले.
या वर्षात लोकसभा निवडणुका, नेत्यांचे पक्षांतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे राज्यातील राजकीय वातावरण सतत चर्चेत राहिले. या सर्व घडामोडींचा गोव्याच्या भविष्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
गोव्यातील अनुसूचित जमाती संघटनांनी ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा जाहीर केला. भाजप सरकारला एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात अपयश आल्याचा आरोप करत, एसटी नेते रूपेश वेळीप यांनी हा निर्णय घेतला. या पाठिंब्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये एसटी समाजाची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे चित्र निर्माण झाले होते.
भाजपने आदिवासी नेत्यांना दिल्लीला नेले. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवून आणली. त्यांनी भाजपच आदिवासींना राजकीय आरक्षण देणार असे वातावरण तयार केले. यामुळे आदिवासी समाजात दोन गट निर्माण झाले, याची नोंदही २०२४ चा आढावा घेताना करावी लागेल.
ताळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट’ने सर्व ११ जागा जिंकल्या. यामुळे पणजीसह शेजारील ताळगाववर स्थानिक पातळीवर मोन्सेरात कुटुंबाची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे उमेदवार आणि आताचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी राज्य घटनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या वक्तव्याचा निषेध करताना गोमंतकीय जनता राज्य घटनेचा अपमान सहन करणार नाही, असे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे काँग्रेसला थोडे मागे सरकावे लागले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. आचारसंहिता संपल्यानंतर सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे कामगारांमध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले. तो प्रश्न या वर्षाच्या अखेरीस जटिल झाला आहे. मार्चपर्यंत कारखान्याच्या कामगारांना सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मार्चनंतर काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे राजकीय पडसाद धारबांदोडा, सावर्डे, सांगे भागात उमटण्यासाठी पोषक वातावरण २०२४ मध्ये तयार झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.