Panjim Bus Stand: गोवा राज्याची राजधानी पणजी बसस्थानकाची स्थिती अनेक महिने उलटूनही तशीच..!

Panjim Bus Stand: पणजी बसस्थानक हे पूर्णपणे समस्यांचे आगर बनले आहे.
Panjim Bus Stand
Panjim Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Bus Stand: पणजी ही राज्याची राजधानी. दररोज हजारो माणसे येथे ये-जा करतात. कोणी कामाच्या निमित्ताने, कोणी सरकारी कार्यालयात, शिक्षणासाठी, खरेदीसाठी, व्यापारासाठी. काही पर्यटक शहर पाहण्यासाठी पणजीत येतात. मात्र, या शहरातील कदंब बसस्थानकाची जी दुरवस्था झाली आहे ती पाहता हे देशातील प्रगत राज्याच्या राजधानीचे बसस्थानक आहे का? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.

हे बसस्थानक पूर्णपणे समस्यांचे आगर बनले आहे. एका अर्थी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पणजी बसस्थानक अनेक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. या स्थानकावर कुठल्याच गोष्टीचे योग्य नियोजन नसल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

नाल्यामुळे दुर्गंधी

बसस्थानकाशेजारी एक नाला आहे त्या नाल्यात गलिच्छ पाणी साचलेले आहे, तसेच अनेक ठिकाणी कचऱ्याचे ठिगारे आहेत त्यामुळे येथे दुर्गंधी पसरलेली आहे. पावसाळ्यात या नाल्यातील गलिच्छ पाणी स्थानकात येते. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे आरोग्यासंबंधी विविध प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत.

Panjim Bus Stand
5G In Goa: गोव्यात 5G सेवा येण्यापूर्वी पोलिस महासंचालकांचा गंभीर इशारा, म्हणाले...

राज्याची प्रतिमा होतेय मलीन

या बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे केवळ राज्यातील नागरिकांनाच त्रास होत आहे, असे नाही तर यामुळे देशात आणि परदेशातदेखील गोव्याची प्रतिमा मलीन होत आहे. कारण राजधानीत येणारे पर्यटक बसस्थानकाची अवस्था पाहून नाव मोठे आणि लक्षण खोटे, असेच बोलतात.

प्रत्यक्षात कृती दिसत नाही

तसे पाहता सरकारनेदेखील या बसस्थानकाच्या विषयाकडे डोळेझाक केली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण गेली कित्येक वर्षे बसस्थानकाच्या डागडुजीची मागणी होत असल्याने केवळ आश्‍वासनेच प्राप्त झाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात कृती दिसत नाही.

कदंब महामंडळ निद्रिस्त

मे 2021 रोजी तोक्ते वादळाने राज्यभर थैमान घातले होते, त्यावेळी पणजी बसस्थानकाचे पत्रे उडाले होते. जे पत्रे उडाले होते ते अजून घातलेले नाहीत. एकंदरीत कदंब महामंडळदेखील बसस्थानकातील समस्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने निद्रावस्थेत आहे, असेच म्हणावे लागेल.

पदपथ विखुरले

कदंब बसस्थानकातील अनेक ठिकाणचे पदपथावर लावण्यात आलेले पेव्हर्स विखुरले आहेत आणि त्यामुळे पदपथ विस्कळीत झाले आहेत. अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने याचे काम झालेले नाही. आताच जर त्यांची डागडुजी केली नाही तर भविष्यात सर्वत्र खड्डे पडण्याची शक्यता आहे.

कचरापेटी कुठेय?

कोणत्याही बसस्थानकावर मूलभूत सुविधा असायला हव्यात. पणजी बसस्थानकावर मात्र त्यांची कमतरता जाणवतेय. पाण्याची बाटली विकत घेतली असता ती रिकामी झाल्यावर टाकायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अस्वच्छता पसरत आहे.

उघड्या गटारांमुळे अपघातांची भीती

बसस्थानकातील काही ठिकाणी गटारे उघड्या स्थितीत आहेत. त्यांवरील झाकणे फुटली आहेत. या गटारांची जर डागडुजी केली नाही तर बसगाड्यांचे चाक त्यात जाऊ शकते तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील ईजा पोहोचू शकते. त्यामुळे त्यांच्या डागडुजीची नितांत गरज असल्याचे प्रवासी सांगतात.

या आहेत समस्या

  • बसस्थानकातील शेडची डागडुजी करणे गरजेचे.

  • उघड्या गटारांची पुनर्बांधणी महत्त्वाची.

  • नाल्याची खोली वाढवावी.

  • प्रवाशांच्या आरोग्याच्या अनुषंगाने स्वच्छता राखावी.

  • स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

  • बसस्थानकावर कचरापेट्या ठेवाव्यात.

  • पदपथ सुधारावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com