पत्रादेवी-धारगळ महामार्ग ठरतोय जीवघेणा, अनेकांचे घेतले बळी! ‘मिशन फॉर लोकल’चा आंदोलनाचा इशारा; खासदार तानावडेंच्या सूचनेलाही केराची टोपली?

Patradevi To Dhargal Highway Danger: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पत्रादेवी ते धारगळ महाखाजनपर्यंतचा मार्ग सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
mission for local protest warning
mission for local protest warning Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पत्रादेवी ते धारगळ महाखाजनपर्यंतचा मार्ग सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास पेडणेवासीयांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘मिशन फॉर लोकल’चे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी दिला.

कोरगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोलवाळ येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाची भेट घेऊन साहाय्यक अभियंता गौतम तारी यांना लेखी निवेदन सादर केले. यावेळी राजू नर्से, सुनील नाईक, माजी सरपंच रुपेश परब, माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई, दिलीप हरमलकर, राजन पार्सेकर, बालन आदी उपस्थित होते.

धारगळ येथे सुरू असलेल्‍या उड्डाणपुलांच्या कामांदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघातांचे (Accident) प्रमाण वाढले आहे. योग्य दिशादर्शक फलक, वाहतूक नियंत्रण यंत्रणा, वाहतूक पोलिस तसेच सुरक्षित वळणांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी वाहनचालकांचा गोंधळ उडत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले असून त्‍यास जबाबदार कोण? असा प्रश्न कोरगावकर यांनी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी साळ येथील राऊत दाम्‍पत्‍याचा या महामार्गावर दुर्दैवी मृत्‍यू झाला होता.

महामार्गावरील जंक्शन तसेच अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ठिकाणी सर्कल पद्धतीची व्यवस्था उभारून वाहतूक सुरळीत करावी, वाहतूक सिग्नल बसवावेत आणि वाहतूक पोलिस तैनात करावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाने नियमितपणे महामार्गाची पाहणी करावी, अशी सूचनाही करण्यात आली. कोरगावकर यांनी यावेळी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अधिकारी हे अनेक वर्षे सेवेत असतात. त्यामुळे केवळ राजकीय दबावाखाली न वागता जनहित लक्षात घेऊन जबाबदारीने निर्णय घ्यावेत, असे ते म्हणाले.

दोन खांब परिसरातील धोकादायक स्थितीबाबत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्‍यात आली. दरम्‍यान, साहाय्यक अभियंता गौतम तारी यांनी निवेदनाची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने सुधारणा करा

महामार्गावर ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, त्या सर्व ‘ब्लॅक स्‍पॉट्‌स’ भागांमध्ये तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी मिशन फॉर लोकलने केली आहे. सर्कल, सिग्नल, दिशादर्शक फलक, रस्ते चिन्हे आणि वाहतूक पोलिसांची व्यवस्था केल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे राजन कोरगावकर यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

महामार्गाच्या बांधकामातील त्रुटी आणि कामाच्या गुणवत्तेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्‍यात आली. अधिकारी दीर्घकाळ सेवेत असल्याने त्यांनी केवळ राजकीय निर्देशांवर न चालता नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. जनहिताच्या दृष्टीने जबाबदारीने काम करणे ही त्यांची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी असल्याचे कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com