

सासष्टी: जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकांसाठी प्रभागांची राखीवता तातडीने आणि आधीच जाहीर करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारकडे केली आहे. तसे न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात सरकारने पारदर्शकता आणि वेळेचे भान राखणे अत्यावश्यक असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले. गोवा फॉरवर्ड पक्षाने ही मागणी करणारे पत्र पालिका संचालकांना पाठवले आहे. नगरपालिका निवडणुका एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीपूर्वी प्रभागांची पुनर्रचना करू नये, या संचालनालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय घटकांच्या सीमा गोठवण्याच्या अधिसूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रभागांची राखीवता ठरवताना पारदर्शकता राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. राखीवता ही गौण बाब नसून
मुक्त, निष्पक्ष निवडणुकीसाठी, उमेदवार ठरविण्यासाठी व निवडणूक डावपेच आखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे, असेही सरदेसाई म्हणाले.
राखीवता जाहीर करण्यात विलंब, अस्पष्टता किंवा शेवटच्या क्षणी सूचना देणे पूर्वग्रहदूषित ठरू शकते. मतदारांचाही संभ्रम होऊ शकतो. अशी कृती लोकशाहीविरोधीआणि नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. पालिका प्रशासन यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त करत अनावश्यक खटले टाळून लोकशाहीचे रक्षण करणे शक्य होईल, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.