Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Goa News : दोन्ही जागांवर भाजपच होणार विजयी, मोदींची सभा हा आनंदोत्सव
Sadanand Sheth Tanawade
Sadanand Sheth Tanawade Dainik Gomantak

पणजी, भाजपचा उत्तर गोव्यातील उमेदवार तब्बल १ लाख, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार दक्षिणेतील उमेदवार ६० हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार, हे निश्‍चित आहे.

देशात इतर ठिकाणी झालेल्या मतांच्या टक्केवारीपेक्षा गोव्यात यावेळी ७० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, असा विश्‍वास राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक'' कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी तानावडे यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासून उत्पल यांच्या टीकेपर्यंत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

सुरुवातीलाच पंतप्रधानांच्या सभेविषयी तानावडे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांची सभा कुडचडेत घ्यायचे ठरले होते; परंतु ते संध्याकाळी येणार असल्याचे कळल्यामुळे आणि कुडचडेत रस्त्याने गेल्यास सर्व दक्षिण गोवा बंद ठेवावा लागला असता. शिवाय पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर रात्री उड्डाण करत नाही.

त्यामुळे सांकवाळला सभा घेण्याचे ठरले. सभेला उपस्थित राहिलेले ५० हजार लोक दक्षिणेतीलच होते. त्यामुळे उत्तर गोव्यातील लोकांना तुमच्यासाठी गृहमंत्र्यांची सभा घेणार असल्याचे सांगावे लागले. दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमचीच आहे, असे ते म्हणाले

राज्यातील कोणत्या भागात वीज नाही, पाणी नाही, असे दिसत नाही. एखादा उठतो आणि बेकायदा घर बांधून वीज व पाणी द्या म्हणून सांगत असेल तर, त्याला ते देता येणार नाही. जी कायदेशीर घरे आहेत, त्यांना शंभर टक्के सुविधा दिली आहे. गावात एखाद्या कुटुंबाला स्वतःचे घर नसेल, अशा कुटुंबाची व्यवस्था असू शकते. एखादी व्यक्ती शहरात भाड्याने राहात असेल, तर त्याची वेगळ्या पद्धतीने व्यवस्था असू शकते.

कला अकादमीचा विषय मुख्यमंत्री पाहतात. ज्यांनी हे कंत्राट घेतले आहे, त्यांनी अद्याप कला अकादमी हस्तांतरित केलेली नाही. मुख्यमंत्री निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यामुळे आचारसंहिता संपताच हे विषय हाताळले जातील. मुख्यमंत्र्यांनी याप्रश्‍नी स्वतः लक्ष घालू, असे सांगितले आहे.

Sadanand Sheth Tanawade
PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल

उघड्यावर शौचमुक्तीबाबत अस्पष्टता

पंतप्रधानांनी ‘हर घर नल’ योजनेचा उल्लेख केला; परंतु गोव्यात ती स्थिती नसल्याचे दर्शविताच तानावडे म्हणाले, यामध्ये काही ठिकाणी सरकारला ॲफेडिव्हिट देऊन ‘आम्हाला नळ नको’, असे लोकांनी कळविले आहे.

अशा भागांमध्ये नळ नसतील; पण उर्वरित भागांमध्ये शंभर टक्के ते दिले आहेत. शंभर टक्के उघड्यावरील शौचमुक्तीवर बोट ठेवताच तानावडे यांनी काही ठिकाणी कौटुंबिक, भावाभावांमध्ये जमिनीचा वाद, शौचालय बांधण्यास आक्षेप, अशा अपवादात्मक बाबी सोडल्या तर इतरत्र शौचालये बांधली आहेत, असे सांगितले. स्थलांतरित झालेल्यांसाठी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी शौचालय सुविधा निर्माण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्पलचे ‘ते’ वक्तव्य चुकीचे :

उत्पल पर्रीकरांच्या अस्वस्थतेविषयी तानावडे म्हणतात, पुन्हा पुन्हा त्या विषयावर बोलणे योग्य नाही. श्रीपाद नाईक कुठे आणि उत्पल कुठे? उत्पलने श्रीपाद नाईक यांच्याविषयी जे वक्तव्य केले, ते अत्यंत चुकीचे आहे.

श्रीपाद नाईक, मनोहर पर्रीकर हे आमचे आदर्श. म्हणून उत्पल पर्रीकर हे आमचे आदर्श होऊ शकत नाहीत. श्रीपाद नाईक यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. श्रीपाद नाईक यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतली आहे. मीही त्यांना भेटणार आहे.

मोदींकडून ‘विजयसभा’ असा उल्लेख

लोकांची गर्दी पाहून ‘ही प्रचारसभा की, विजयसभा आहे?’ असे पंतप्रधानांनी म्हटले. त्यामुळे सभा आयोजनाबाबत ते संतुष्ट असतील. ही सभा नव्हे, आनंदोत्सव होता. जरी एक तास विलंबाने पंतप्रधान आले, तरी सर्वजण थांबले होते. कोणासही धरून आणले नाही. लोक स्वखुषीने आले होते. पंतप्रधान मोदी यांचे भाषण दोन पद्धतींनी झाले.

त्यांनी लोकांशी संवाद साधला. ज्या पद्धतीने त्या सभेत उत्साह होता, त्यातून आम्हाला नक्कीच यश मिळेल. पंतप्रधानांच्या सभेमुळे आणखी त्यात भर पडली आहे, असे तानावडे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष उवाच...

मुरगावामध्ये संकल्प आमोणकर-मिलिंद नाईक, पणजीत बाबूश मोन्सेरात-उत्पल पर्रीकर, पेडण्यात दयानंद सोपटे, जीत आरोलकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांची सर्व मते भाजपच्या उमेदवारांना मिळतील काय? यावर तानावडे म्हणतात, प्रत्येकाच्या ठिकाणी नेते आहेत, ते भाजपशी संबंधित आहेत.

जीत यांना मंत्रिपद देण्याविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर तानावडे म्हणाले, त्या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर मंत्री आहेत. कोणाला मंत्रिपद द्यायचे, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.

काँग्रेस किंवा इंडिया आघाडी ही दिशाहीन आहे. त्यांच्याकडे अजेंडा नाही. वर्षाला एक पंतप्रधान देणार असल्याचे ते सांगतात. स्थिर सरकार असल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही.

ज्यांना गोव्याविषयी प्रेम नाही, त्यांना तुम्ही अडवू शकत नाही. पासपोर्ट सरेंडर केला, त्यात काय चूक केली? जे बाहेर गेले आहेत, ते काही वर्षांनी आपली चूक झाली म्हणून परत येतील. दुहेरी नागरिकत्व मिळणार नाही, हे आजही आम्ही सांगतो. ज्याला कुटुंबाची आवड आहे, तो कधीच परदेशात जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com