
डिचोली: प्रतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनी महिलांच्या उत्साहाला उधाण देणारे व्रत म्हणजेच वटपौर्णिमा. येत्या मंगळवारी (ता. १०) वटपौर्णिमा साजरी होत असल्याने सध्या सर्वत्र या व्रताच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. वटपौर्णिमेला लागणारे साहित्यही बाजारात दाखल झाले असून, बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.
डिचोली बाजारात वटपौर्णिमेच्या साहित्याची खरेदी सुरू झाली असून, उद्या आणखी खरेदीला जोर येणार आहे. तसे संकेतही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. बाजारात यंदा अननसांची आवक समाधानकारक असली तरी अधिकाधिक अननस राज्याबाहेरील असल्याचे आढळून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अननसांसह अन्य फळांचे दर नियंत्रणात असून, मानकुरादसह गावठी आंबे मात्र बाजारातून गायब झाले आहेत.
दरांच्या बाबतीत कोणतीही घासाघीस न करता सुवासिनी महिला हे साहित्य उत्साहाने खरेदी करत आहेत. उद्या बाजारात मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीस उपलब्ध झाले, तर दर खाली येण्याची शक्यता आहे.
फणस १५० रुपये, वडाची फांदी २० रुपये, रसाळ फणस आकाराप्रमाणे १०० ते १५० रुपये तर कापा फणस २०० ते ३०० रुपये याप्रमाणे विकला जात आहे. फणसांसह सोललेल्या गऱ्यांना देखील मोठी मागणी आहे. तोतापुरी आणि अन्य जातीचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. वडाची फांदी २० रुपयांना एक तर वडाच्या पानांनाही मागणी आहे. आकाराप्रमाणे ५० ते १०० रुपये एक नग असे अननसांचे दर आहेत. तरीसुद्धा खरेदीला मोठी गर्दी होत आहे.
रविवारपासून डिचोलीचा बाजार वटपौर्णिमेच्या साहित्याने फुलू लागला आहे. अननस, आंबे, फणस, केळी आदी फळांसह वडाच्या फांद्या, वडाची पाने, अणशीचे दोर आदी साहित्य बाजारात दाखल झाले आहे. उद्या मोठ्या प्रमाणात हे साहित्य बाजारात उपलब्ध होणार असून, खरेदीला जोर येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.