Goa Liberation Day: भारतीय सैन्यापुढे अवघ्या 36 तासांत पोर्तुगीजांनी टेकले गुडघे; कसे मिळाले गोव्याला स्वातंत्र्य? जाणून घ्या...

गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी भारतात सामील झाला; रशियाने वापरला होता व्हेटो
Goa Liberation Day
Goa Liberation DayDainik Gomantak

Goa Liberation Day: गोवा हे भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहे. आजघडीला गोवा स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाईफ, खुल्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. पण, देश स्वतंत्र झाला तेव्हा गोवा स्वतंत्र झाला नव्हता.

कारण देशावर इंग्रजांचे राज्य असले तरी गोव्यात मात्र पोर्तुगीजांची सत्ता होती. त्यामुळे गोवा पारतंत्र्यातच होता. अखेर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला आणि भारतात सामिल झाला.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षांनी त्यासाठी ऑपरेशन विजय राबवण्यात आले होते. त्यामुळे 19 डिसेंबर हा दिवस त्यानंतपासून गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशात अनेक संस्थाने होती. काही ठिकाणी परकीय शक्तींची सत्ता होती. गोवा देखील असाच प्रांत होता जिथे 450 वर्षे पोर्तुगीजांचे राज्य होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.

Goa Liberation Day
Goa Liberation Day: गोवा मुक्ती दिनानिमित्त नौदलाने गोव्याला दिली INS Mormugao ची भेट

गोव्याला स्वातंत्र्य कसे मिळाले?

देशाच्या स्वातंत्र्यासोबतच गोव्याच्या स्वातंत्र्यासाठीही आंदोलन सुरू झाले होते. 18 जून 1946 रोजी पोर्तुगीजांना राम मनोहर लोहिया यांनी आव्हान दिले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकार आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकवेळा बोलणी केली पण पोर्तुगीज कोणत्याही प्रकारे गोवा मुक्त करण्याच्या बाजूने नव्हते.

भारत सरकारने 1955 मध्ये गोव्यावर आर्थिक निर्बंध लादले. पण पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली नाही. भारताने अनेक कुटनीती वापरूनही पोर्तुगीज बधले नाहीत. भारतातील मुख्य बंदरे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती.

त्यामुळे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्त करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पण, पोर्तुगाल हा तेव्हा 'नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन' (नाटो) चा सदस्य होता. त्यामुळे पंतप्रधान नेहरू लष्करी बळाचा वापर करणे लांबवत होते.

नोव्हेंबर 1961 मध्ये पोर्तुगीज सैनिकांनी गोव्यातील मच्छिमारांवर गोळीबार केला त्यात एका मच्छिमाराचा मृत्यू झाला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. तेव्हा नेहरूंनी तत्कालीन संरक्षण मंत्री केव्ही कृष्ण मेनन यांच्यासोबत तातडीची बैठक घेत लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.

या बैठकीनंतर 17 डिसेंबर रोजी ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश गोवा मुक्त करणे हा होता. या मोहिमेअंतर्गत नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे 30 हजार सैनिक तैनात करण्यात आले होते.

पोर्तुगीजांनी सुरुवातीला लढण्याचा निर्णय घेतला होता पण भारतीय सैन्याने वास्कोजवळील पूल उडवून दिल्यानंतर पोर्तुगीजांनी शरणागती स्विकारली. या हल्ल्याच्या अवघ्या 36 तासांनंतर पोर्तुगीजांनी गोव्यावरील ताबा बिनशर्त सोडण्याचा निर्णय घेतला.

Goa Liberation Day
Margao Railway Station वर नवीन वर्षापासून पॉड हॉटेल; कोकण रेल्वेचा उपक्रम

यानंतर गोवा भारतात सामील झाला आणि केंद्रशासित प्रदेश बनला. 30 मे 1987 रोजी गोव्याला भारताच्या पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि तेव्हापासून आजतागायत 30 मे हा दिवस गोव्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

अशा रितीने गोव्याच्या इतिहासात या तीन तारखांना खूप महत्व आहे. 18 जून, 19 डिसेंबर आणि 30 मे. गोव्याची राजधानी पणजीमध्ये एका महत्वाच्या मार्गाला 18 जून रोड असे नावदेखील देण्यात आले आहे.

पोर्तुगालचा जळफळाट, संयुक्त राष्ट्रात नेला प्रश्न

गोवा हातातून गेल्यानंतर जळफळाट झालेल्या पोर्तुगालने संयुक्त राष्ट्रात हा विषय नेला होता. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी पोर्तुगालच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. भारताने सैन्य मागे घ्यावे, असा पोर्तुगालचा प्रस्ताव होता. चीन, इक्वेडोर, चिली, ब्राझिल यांनीही पोर्तुगालला पाठिंबा दर्शविला होता.

तत्कालीन सोव्हिएत रशिया, लायबेरिया, श्रीलंका या देशांनी मात्र भारताला पाठिंबा दिला. सोव्हिएत रशियाने व्हेटो (नकाराधिकार) चा वापर करून पोर्तुगालचा प्रस्ताव पाडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com