![Goa Governor Pillai Statment On Nathuram Godse](http://media.assettype.com/dainikgomantak%2F2023-09%2F14472989-f2f4-4f3b-98ad-c8e87e1f0147%2FBANNER___2023_09_05T104051_306.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nathuram Godse Was A “Curse” Of The Country Says Goa Governor: महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशाला लाभलेला शाप आहे असे विधान राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यपालपदी येण्याआधी दोनवेळा पिल्लई भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष होते.
विद्यार्थी जीवनापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जोडले गेले आहेत. असे असतानाही त्यांनी हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने केली आहेत.
आता पिल्लई हेही अशी विधाने करू लागले आहेत की काय अशी शंका यावी एवढे धाडसी विधान त्यांनी केल्याचे वृत्त केरळमधील वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांनी दिले आहे.
गांधी विरुद्ध नथुराम या वेलियम राजीव यांच्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात मल्याळी भाषेत बोलताना त्यांनी हे विधान केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
राज्यपाल अधून मधून केरळमध्ये जात असतात. विशेषतः आठवडा अखेरीस ते केरळमध्ये असतात. अलिकडील दौऱ्यात त्यांनी सध्या सक्रिय नसलेल्या अशा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
त्याशिवाय अनेक कार्यक्रमांत ते सहभागी होत असतात. एकदा पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी त्यांनी कालिकत येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रित केले होते.
‘मी गांधीजींच्या स्मृतींसमोर नतमस्तक’
केरळमधील वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांनी वृत्तात नमूद केल्यानुसार राज्यपालांनी उत्स्फूर्तपणे एक तासभर भाषण केले. त्या भाषणादरम्यान गोडसे यांचा किरकोळ उल्लेख त्यांनी केला.
मात्र, त्यांनी आपल्या भाषणातून गांधी तत्त्वज्ञानावर अधिक भर दिला होता. ‘कोणत्याही कारणाने गोडसे याने गांधींची हत्या करायला नको होती’ असे ते म्हणाले होते.
भाषण संपवताना राज्यपालांनी म्हटले, की ‘मी गांधीजींच्या स्मृतींसमोर नतमस्तक होतो. हे जग जोवर अस्तित्वात असेल, तोवर गांधी स्मरणात राहतील. त्यांनी मानवतेचा मार्ग सर्वांना दाखवला. गोडसे हा देशाला लाभलेला शाप म्हणून अस्तित्वात राहील.’
"मी मूळ भाषण मल्याळममध्ये केले होते. आता मी प्रवासात आहे. कोणत्या संदर्भाने कोणते विधान आले हे महत्त्वाचे असते. आल्यावर या विषयावर अधिक खुलासा मी करू शकेन. आता तसे विधान मी केले आहे की नाही असे एका ओळीत सांगू शकत नाही."
पी. एस. श्रीधरन पिल्लई, राज्यपाल
"नथुराम गोडसे बद्दल गोव्याचे राज्पाल श्रीधरन पिल्ले यांनी जे वक्तव्य केले आहे ते धाडसाचे असून त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. नथुराम गोडसे यांनी महात्माजींची हत्या करून या देशात जातीय द्वेष, फूट आणि वैमनस्याची बीजे पेरली. त्यामूळे त्याच्या कृतीचा निषेध व्हायलाच पाहिजे. राज्यपालांचे वक्तव्य गोडसे भक्तांसाठी एक जबरदस्त संदेश असे म्हणावे लागेल."
-विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष
गांधी आस्थेचा विषय
राज्यपालांची केरळमधील भाषणे मल्याळममध्ये असतात. आणीबाणीचे दिवस हे लोकशाहीतील काळेकुट्ट दिवस होते असे जाडजूड पुस्तक लिहिणारे राज्यपाल हे महात्मा गांधी यांच्याविषयी नेहमीच भरभरून बोलतात.
गांधी यांची भूमी म्हणून भारताची जगभरात ओळख आहे असा दाखला आपल्या भाषणातून ते वारंवार देत असतात. असे असले तरी नथुराम गोडसे व गांधी यांची तुलना त्यांनी कधी केली नव्हती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.